कर्तव्यदक्ष, डॅशिंग आणि सशक्त नेतृत्व लाभणार रायगडला
रायगड : रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकपदी आयपीएस अधिकारी आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलिस बल गट क्र. १ मधून त्यांची रायगड जिल्ह्यात बदली झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यात उत्सुकता व सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
आंचल दलाल या एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून राज्यात ओळखल्या जातात. त्यांनी याआधी अनेक महत्वाच्या ठिकाणी जबाबदारी पार पाडली असून, गुन्हेगारी नियंत्रण, महिला सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांसारख्या मुद्द्यांवर त्यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे. त्यांचा प्रशासनावर असलेला मजबूत पकड आणि जनतेशी असलेली जवळीक हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य मानले जाते.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या त्या पत्नी असून, एक यशस्वी व डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे त्या ज्या विभागात कार्यरत राहिल्या आहेत, तेथे पोलीस दलात शिस्त व कार्यक्षमता वाढली आहे. त्यामुळे रायगडसारख्या ऐतिहासिक व संवेदनशील जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलावी, अशी जनतेत अपेक्षा आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्याचे विद्यमान पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्यानगर येथे करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात देखील जिल्ह्याने अनेक गुन्हेगारी प्रकरणांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवले होते. आता त्यांच्या जागी आंचल दलाल यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याच्या सुरक्षेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात महिला अधिकाऱ्यांच्या प्रभावी नेतृत्वाचे हे आणखी एक उदाहरण ठरणार असून, त्यांच्या नियुक्तीमुळे महिला सुरक्षितता, युवकांशी संवाद, आणि समाजोपयोगी उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास पोलिस दलात आणि जिल्ह्यातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
Post a Comment