कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये २२ ते २४ मे दरम्यान हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, २४ तारखेला ‘अत्यंत अतिवृष्टी’ची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड:
रायगड जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा आहे. २४ मे रोजी काही ठिकाणी अत्यंत अतिवृष्टी होऊ शकते. २५ आणि २६ मे रोजी पावसाचा जोर कमी होईल, परंतु जोरदार पावसाची शक्यता कायम राहील.
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यासाठीही २२ ते २४ मे या कालावधीत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज असून, वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात सुद्धा २५ आणि २६ मे रोजी पावसाचा प्रभाव काहीसा सौम्य होण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर:
या शहरी भागांमध्येही २२ ते २५ मे या कालावधीत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई व ठाण्यात २४ मे रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, २६ मे रोजी मात्र पावसाचा जोर तुलनेत कमी राहील.
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान तुलनात्मकदृष्ट्या सौम्य राहण्याची शक्यता असून, सर्व पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
सतर्कतेचे आवाहन:
कोकण विभागातील सर्व प्रशासनांना आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नद्या, घाटमाथा व दरडग्रस्त भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. समुद्रकिनारी जाणा-या पर्यटकांनी देखील पुढील काही दिवस प्रवास टाळावा, असे सांगण्यात आले आहे.
Post a Comment