समजून घेऊ या कृषी विभागातील विविध पुरस्कार व त्याचे निकष…!


कृषी विभागाचे विविध पुरस्कार (भाग-1)

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषीभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषीभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी व कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येते.  तसेच याच विविध पुरस्कारांच्या धर्तीवर सन-2020 पासून राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांनाही युवा शेतकरी पुरस्कार देण्यात येणार आहे.

शासनाच्या सन 2020 करिता 1) डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न, 2) वसंतराव नाईक कृषीभूषण 3) जिजामाता कृषीभूषण, 4) सेंद्रीय शेती कृषीभूषण, 5) वसंतराव नाईक शेतीमित्र, 6) युवा शेतकरी, 7) उद्यान पंडीत, 8) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारांकरिता शेतकरी निवड व प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जाहीर केल्या आहेत.

            या तीन भागांच्या लेखमालिकेतून विविध कृषी पुरस्कारांचे स्वरुप, दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या आणि निकष याची माहिती आपल्याला देत आहोत.

समजून घेऊ या कृषी विभागातील विविध पुरस्कार व त्याचे निकष…! 

डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार :-

पुरस्काराचे स्वरुप :-

डॉ.पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा राज्याच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या व्यक्ती/गट/संस्थेस रु.75 हजार रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. देण्यात येणारे पुरस्कार संख्या 1.

पुरस्काराचे निकष :-

v  कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती/गट/ संस्थेला पुरस्कार देण्यात यावा. प्रस्तावित व्यक्ती/ गट/संस्था यांनी केलेले कार्य संपूर्ण राज्याला दिशादर्शक आणि उल्लेखनीय असावे.

v  प्रस्तावित व्यक्ती/गट/संस्था यांना केंद्र किंवा राज्यशासनाचा कोणताही कृषि पुरस्कार प्राप्त झालेला असावा.

v  शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबियासह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा.

v  यशस्वी उत्पादन, रोपवाटिका, बीजोत्पादन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन व वापर,काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पॅकहाऊस, साठवणूक, मूल्यवर्धन, प्रक्रिया, विपणन, निर्यात इ.कार्यात सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा.

v  पुरस्कारासाठी निवडावयाचा शेतकरी हा यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती, गांडुळ खत युनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पध्दतीच्या शेती पध्दती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इ.बाबत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा असावा. याबरोबरच पीक स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, संशोधन संस्थांना भेटी इ.उपक्रमामध्ये सहभागी होणारा आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकऱ्यांना अशा उपक्रमांत सहभागासाठी उदयुक्त करणारा असावा. पीक स्पर्धा, प्रदर्शने इ. मधील सहभाग/पारितोषिक इ. चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.

v   शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 05 वर्षे इतके असावे.

v  संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगिकृत संस्थेमध्ये नोकरी करीत नसून किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसून,सेवा निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसल्याबाबत स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.

v  शेतकरी संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

v  संबंधितांनी प्रस्तावासोबत मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ई सहपत्रित), 7/12, 8-अ सादर करणे आवश्यक आहे.

v  कृषी आयुक्तालय स्तरावरून संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी संबंधित प्रस्तावाची समक्ष क्षेत्रीय पाहणी करावी.

v  या पुरस्कारासाठी प्राप्त सर्व प्रस्तावांचे गुणांकन व मुल्यांकन प्रपत्र 1 मध्ये करावे. जिल्हास्तरीय समितीने गुणांकन व मूल्यांकन करुन प्रस्तावासोबत प्रपत्र 1 विभाग स्तरीय समितीकडे सादर करावेत. विभागस्तरीय समितीने प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करुन प्रस्तावासोबत प्रपत्र 1 कृषि आयुक्तालय समितीकडे सादर करण्यात यावे.

|
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार :-

पुरस्काराचे स्वरुप :-

वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कारासाठी विजेत्या शेतकऱ्याला रु.50 हजार रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तीपत्र व सपत्नीक/पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे. देण्यात येणारी पुरस्कार संख्या 08 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे).

पुरस्काराचे निकष :-

ü  प्रस्तावित शेतकरी हा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेला व केंद्र किंवा राज्यशासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी असावा.

ü  शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबियांसह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा.

ü   यशस्वी उत्पादन,रोपवाटिका, बीजोत्पादन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन व वापर, काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पॅकहाऊस, साठवणूक, मूल्यवर्धन, प्रक्रिया, विपणन, निर्यात इ.कार्यात सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करणारा व अधिक नफा मिळविणारा असावा.

ü  पुरस्कारासाठी निवडावयाचा शेतकरी हा यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती, गांडुळ खत युनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पध्दतीच्या शेती पध्दती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इ. बाबत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारा असावा. याबरोबरच पीक स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, संशोधन संस्थांना भेटी इ.उपक्रमामध्ये सहभागी होणारा आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञान प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होणारा तसेच परिसरातील शेतकऱ्यांना अशा उपक्रमांत सहभागासाठी उदयुक्त करणारा असावा. पीक स्पर्धा, प्रदर्शने इ. मधील सहभाग/पारितोषिक इ.चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.

ü   शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 03 वर्षे इतके असावे.

ü  संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसून किंवा सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी नसून, सेवा निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषीत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.

ü  शेतकरी संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

ü  संबंधितांनी प्रस्तावासोबत मूळ प्रती तील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ई सहपत्रित), 7/12,8 अ सादर करणे आवश्यक आहे.

ü   विभागस्तर समितीने संबंधित शेतकऱ्याची/संस्थेची प्रस्तावात उल्लेखीत केलेल्या बाबींची समक्ष क्षेत्रीय पाहणी करावी.

ü   या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रपत्र 2 मध्ये गुणांकन व मूल्यांकन करुन गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 2 विभागस्तरीय समितीकडे सादर करावे.

ü  विभागस्तरीय समितीने प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करुन गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 2 कृषी आयुक्तालय समितीकडे सादर करावे.

|
जिजामाता कृषीभूषण पुरस्कार :-

पुरस्काराचे स्वरुप :- जिजामाता कृषीभूषण हा पुरस्कार केवळ महिला शेतकऱ्यांसाठी असून विजेत्या महिलेला रु.50 हजार  रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. देण्यात येणारे पुरस्कार संख्या 08 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे)

पुरस्काराचे निकष :-

Ø  राज्यातील सर्व महिला शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र असतील तथापि केंद्र किंवाराज्यशासनाचा कोणताही कृषी पुरस्कार प्राप्त असल्यास प्राधान्य देण्यात यावे.

Ø   महिला शेतकरी यांच्या स्वतःच्या नावावर किंवा पतीच्या नावावर शेती असावी आणि त्या कुटुंबियासह शेती करणाऱ्या असाव्यात.

Ø   यशस्वी उत्पादन,रोपवाटिका, बीजोत्पादन, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन व वापर, काढणीत्तोर व्यवस्थापन, प्रतवारी, पॅकहाऊस, साठवणूक, मूल्यवर्धन, प्रक्रिया, विपणन, निर्यात इ. कार्यात सहभागी होऊन उल्लेखनीय कार्य करणारी व अधिक नफा मिळविणारी महिला शेतकरी असावी.

Ø   पुरस्कारासाठी निवडावयाची महिला शेतकरी ही यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती, गांडुळ खत युनिट, कृषी प्रक्रिया, आधुनिक पध्दतीच्या शेती पध्दती, काढणीत्तोर व्यवस्थापन, पणन, निर्यात इ. बाबत परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदशन करणारी असावी. याबरोबरच पीक स्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, संशोधन संस्थांना भेटी इ.उपक्रमामध्ये सहभागी होणारी आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसार कार्यात सहभागी होणारी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना अशा उपक्रमांत सहभागासाठी उदयुक्त करणारी असावी. पीक स्पर्धा, प्रदर्शने इ. मधील सहभाग/पारितोषिक इ. चा तपशील प्रस्तावासोबत पुराव्यासह देण्यात यावा.

Ø   शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 03 वर्षे इतके असावे.

Ø   संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करीत नसून किंवा सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी नसून, सेवा निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसलेबाबत स्वयंघोषीत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.

Ø  शेतकरी संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास ते पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.

Ø  पतीला मिळालेल्या पुरस्काराकरिता पत्नीला पुन्हा नव्याने अर्ज करता येणार नाही.

Ø  संबंधितांनी प्रस्तावासोबत मूळ प्रतीतील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ई सहपत्रित), 7/12.8-अ सादर करणे आवश्यक आहे.

Ø   विभागस्तर समितीने संबंधित महिला शेतकऱ्याची प्रस्तावात उल्लेखीत केलेल्या बाबींची समक्ष क्षेत्रीय पाहणी करावी.

Ø   या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रपत्र 2 मध्ये गुणांकन व मूल्यांकन करुन गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 2 विभागस्तरीय समितीकडे सादर करावे. विभागस्तरीय समितीने प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करुन गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 2 कृषी आयुक्तालय समितीकडे सादर करावे.

 |

वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार :-

पुरस्काराचे स्वरुप :-

वसंतराव नाईक शेतीमित्र हा शेती क्षेत्रात प्रभावीरित्या विस्तार कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था/ वृत्तपत्र साप्ताहिके/मासिके/ दूरचित्रवाहिन्या यांना दिला जातो. संबंधित व्यक्ती शेतकरी असावा किंवा त्याच्या नावावर 7/12 असावा, असे बंधन नाही. मात्र शेतकरी असल्यास त्यास प्राधान्य देण्यात येईल. या पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याला रु.30 हजार रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह (ट्रॉफी), प्रशस्तिपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  देण्यात येणारी पुरस्कार संख्या 08 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे).

पुरस्काराचे निकष :-

कृषीविषयक दैनिक / साप्ताहिक / मासिकामधून अभ्यासपूर्ण लेख, कृषी विषयक योजनांची प्रचारप्रसिद्धी, शेतकऱ्यांच्या यशोगाथा इ. बाबतची माहिती देणाऱ्या तसेच प्रिंट / इलेक्ट्रॉनिक यांसारख्या समाजमाध्यमांचा वापर करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन कृषी विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती/ संस्था / वृत्तपत्र / साप्ताहिके/ मासिके / दूरचित्रवाहिन्या इत्यादींचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात यावा.
 शासनाच्या कृषी विषयक धोरणांचा प्रचार व प्रसिद्धी मध्ये सक्रिय सहभाग असावा.
 शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान 03 वर्षे इतके असावे.
संबंधिताकडून ते केंद्र/राज्य शासकीय/निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करीत नसून किंवा सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी नसून, सेवा निवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेत नसल्याबाबत स्वयंघोषीत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे.
व्यक्ती/संस्था यांना यापूर्वी प्रस्तुतचा पुरस्कार मिळाला असल्यास पुन्हा याच पुरस्कारासाठी पात्र असणार नाहीत.
संबंधितांनी प्रस्तावासोबत मूळ प्रती तील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र (प्रपत्र ई सहपत्रित) सादर करणे आवश्यक आहे.
 विभागीय स्तरावरून संबंधित विभागीय कृषी सहसंचालक यांनी संबंधित शेतकऱ्याची/संस्थेची प्रस्तावात उल्लेखीत केलेल्या बाबींची समक्ष क्षेत्रीय पाहणी करावी.
 या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीने प्रपत्र 4 मध्ये गुणांकन व मूल्यांकन करुन गुणानुक्रमे आलेल्या पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 4 विभागस्तरीय समितीकडे सादर करावे. विभागस्तरीय समितीने प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करुन गुणानुक्रमे पहिल्या दोन प्रस्तावासोबत प्रपत्र 4 कृषी आयुक्तालय समितीकडे सादर करण्यात यावे.
या योजनांच्या व पुरस्कार प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशीदेखील आपण संपर्क साधू शकता, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा