एक अविस्मरणीय अनुभव : किल्ले रायगड


एक अविस्मरणीय अनुभव: किल्ले रायगड 

छाया म्हात्रे | रायगड

             मनात निश्चय करून यावेळी तिसऱ्या शनिवारी सुट्टी असल्याने  गावी जायचं ठरवलं आणि त्यानुसार बेत आखला. सोबत माझी मैत्रीण येणार होती.
       बेत ठरला होता तो रायगड ट्रेकिंग चा.... गावी आले शुक्रवारी रात्री  आणि रविवारी जायचं ठरवलं. दिवस होते मुसळधार पावसाचे, आईला काय बरं सांगावं काही कळेना ...खोटं तर बोलू शकत नाही कारण नंतर खोटं निस्तरण खूप अवघड असतं....  आईला सांगितले की मी महाडला राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीला भेटायला जाते आणि तेथून रायगडावर जाणार आहोत.
           आईला माहीत होते की खूप दिवसांपासून प्लॅन करतेय अपर्णा कडे जायचं , त्यामुळे तिनेही थांबवलं नाही . आणि तसाही तिचा माझ्यावर असलेला पूर्ण विश्वास यामुळे तिने कधीच मला काही करण्यापासून अडवलं नाही आणि तिचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीही तोडणार नाही.....
      सकाळी 7 वाजता दोघीही एसटी मध्ये बसलो... दोघींच्या डोक्यात एकच विचार की आपण अशा मुसळधार पावसात रायगड सारख्या अभेद्य आणि उंच किल्ल्यावर जाण कितपत योग्य आहे, की जाण रद्द करावं...पण एकमेकीला केलेल्या चॅलेंज प्रमाणे कोणीही माघार घ्यायला तयार होईना ....आणि हे एकमेकींना सांगायचं कसं... शेवटी माणगावला पोहचल्यावर बोलू लागलो की आपण आज नको यायला पाहिजे होते....कारण असाच पाऊस सुरु राहिला तर कस जाणार, आपला निर्णय तर चुकला नाही ना ! ही चर्चा चालू असतानाच ठरवलं की आता काहीही होउदे इतक्या लांब येऊन परत जायचं नाही. जे काही होईल ते पाहू. महाराजांचं नाव घेऊन पुढील प्रवास सुरु केला.
 .   मोठ्या ऐटीत ट्रेकिंगला निघालो पण कस जायचं...महाड वरून बस किती वाजता असेल ?,ती नसेल तर दुसरा पर्याय काय असेल तिथून परत कस यायचं याच काहीही नियोजन न करता पहिल्यांदा प्रवासाला निघालो होतो...महाडला पोहचलो बस स्टॉप वर चौकशी केली तर बस केव्हाच सुटली होती अन पुढची बस दुपारी होती, इतक्या उशिरा किल्ल्यावर जण ठीक नव्हतं कारण परतीच्या प्रवासच सगळंच गणित कोलमडले असते. मग पुन्हा माहिती काढत काढत एक ट्रॅकस मिळाली पण ती 2 तास तरी भरणार नाही असं अंदाजवरून वाटत होतं..पुन्हा एकदा मनात शंकेची पाल चुकचुकली की रायगड ट्रेक पूर्ण करू की नाही....
       तितक्यात तिशीच्या वयातला एक मुलगा ड्रायव्हर सोबत चर्चा करताना दिसला. एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून वाटत होत की त्याला गडावर जायची खूप घाई होती, कोणी तरी मोठी आसामी किल्ल्यावर येणार होती. आमचा विश्वास बसत नव्हता की ती  ट्रॅकस 2 तास भरली नसती ती लगेच निघाली सुद्धा....फक्त आम्ही चौघेजण .....आम्ही दोघी , तो मुलगा आणि ड्रायव्हर. किल्ल्याचा तो आमचा प्रवास सुरु झाला. जाताना ते नयनरम्य निसर्ग सौंदर्य डोळ्यात आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यात एकाच वेळी साठवण्याचा  प्रयत्न करत होतो. पण ते करत असताना मोबाईल पेक्षा ते सौंदर्य डोळ्यांत साठविणे जास्त सुख देणारे होते
       गडाच्या पायथ्याशी पोहचलो... जाताना रोपवे ने जायचं हे आधीच ठरलं होतं. त्याप्रमाणे तिकीट काढायला गेलो..आमचा नंबर येईपर्यंत आम्ही विचार करत होतो की येताना पण रोपवे ने यायचं की गड पायी उतरायचं... हो नाही करता करता म्हटलं जे होईल ते पाहू तिकीट वन वे च काढुया ,परत येताना पायी येऊ म्हणजे पावसाळ्यातील गडाचं सौंदर्य अधिक जवळून पाहता येईल..काय होत माहीत नाही पण त्या दिवशी मा. संभाजीराजे भोसले साहेब गडावर आले होते आणि आमच्या सोबतच्या दुसऱ्या रोपवे ने जाण्यासाठी निघाले....म्हणजे सकाळी त्या मुलाला इतकी घाई का झाली होती त्याच कोड उलगडलं होत...बरं, असो त्या निमित्ताने का होईना किल्ल्यावर येता आले.


पहिल्यांदाच रोपवने प्रवास करत होतो ...उंचच उंच कड्यांवरुन कोसळणाऱ्या दुधाळ धारा मनाला न्हाऊ घालत होत्या. पृथ्वीवरील स्वर्ग काय याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो...चारी दिशांनी अंगाला झोंबणारा गार वारा, वाऱ्यामुळे हलका बरसणारा पण टोचणारा पाऊस...दाट धुकं ...त्यामुळे आम्ही कुठे आहोत याचा अंदाजच येत नव्हता ..काही मिनिटांचा प्रवास पण असं वाटत होतं की खूप काळ हा अनुभव घेतोय..आणि असाच घेत राहावा अस वाटत होतं . आमच्या बाजूच्या रोपवे तुन महाराजांचा जयघोष ऐकू येत होता. आम्ही ही आमचा आवाज त्यात मिसळू लागलो....
        "'छत्रपती शिवाजी महाराज की जय" . तो क्षण अनुभवताना शिवकाळात गेलो आणि विचार करू लागले की, या अशा पावसाळ्यात इतक्या उंच गडावर महाराज, आऊसाहेब, राणीवसा, अष्टप्रधान मंडळ, रयत कशी राहिली असेल ? कशी जगली असेल आणि याच निसर्गाच्या कधी छायेत तर कधी रौद्ररूपात देखील स्वराज्य निर्मितीच्या ,बळकटीच्या मोहिमा आखल्या असतील.. इथूनच स्वराज्य घडताना आणि स्वराज्याची घडी बसताना पहिली. या मातीने माझ्या राजाला छत्रपती होताना पाहिलं. केवढ ते भाग्य थोर. इथे छत्रपती संभाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे बाळकडू  मिळाले.  महाराजांचा अखेरचा निरोप आणि स्वराज्याची बसलेली घडी विस्कटताना या गडाने, दर्याखोर्यांनी अश्रू नयनांनी पहिली असेल. किती आनंद आणि दुःख झेलले आणि त्यातून सावरण्याचे बळ दिले ते या माझ्या रायगडाने...
          या विचारात कधी किल्ल्यावर पोहचलो ते कळलंच नाही. सर्वत्र धुकं आणि मुसळधार पाऊस. आम्ही आणलेल्या छत्र्या काही यात टिकाव धरत नव्हत्या. मी रेनकोट घातला होता म्हणून फक्त जोराचा पाऊस लागत नव्हता पण चिंब भिजलो होतो आणि थंडीने हात पाय गार पडायला सुरुवात झाली होती. अजून आम्ही रोप वे च्या ठिकाणी होतो. आजूबाजूला इतकं दाट धुकं होत की किल्यावर आम्ही दोघीच आहोत असं वाटू लागलं.... सुरुवातीला थोडं घाबरोलच की आपण दोघीच पुढे कस जायचं....मग धीर करून चालू लागलो. पुढे जसजस  जवळ जाऊ तशी इतर माणसेही दिसू लागली. राणीवसा, महाराजांचा महाल, अंधार कोठडी, अष्टप्रधान मंडळाचं निवास, ...सर्व पाहत महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्थानी, सदर महालात पोहचलो...श्रीमान योगी, छावा, राजा शिवछत्रपती या पुस्तकांत अनुभवलेला रायगड , महाराजांचं स्वराज्य उभारण्याच्या धावपळीत गेलेलं जीवन, डोळ्यासमोर उभं करण्याचा अवखळ प्रयत्न करत होते....
           इतका मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा ,थंडीने पूर्ण गारठून गेलो असताना या ठिकाणी एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती.  कदाचित इथल्या मातीत, वाहणाऱ्या वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीमध्ये, पावसाच्या प्रत्येक थेंबात चैतन्य, जोश, प्रेरणा मिळते. महाराजांच्या दर्शनाने ध्यन्य झाल्यासारखे वाटत होते.
           महाराजांच दर्शन घेऊन नगारखान्यातून होळीच्या माळावर आलो. आता खरच खूपच वाईट अवस्था झाली होती. हातापायाची बोट सुन्न पडायला लागली होती.  सोबतच्या लोकांनी प्लॅस्टिकच्या मोठ्या कापडाचे रेनकोट घातले होते , हे कुठे मिळेल म्हणून चौकशी केली तर ते पायथ्याशीच मिळते अस समजलं , आता आम्हा दोघींकडे भिजन्यावाचून  पर्याय नव्हता. पाऊस आणि वारा कमी व्हायचं नाव घेत नव्हता. बाजारपेठेतून जगदीश्वराच्या दर्शनाला निघालो. वाऱ्यापावसाच्या खेळात तग धरून राहण्यासाठी आम्ही एकमेकींना घट्ट पकडून चाललो होतो .
            मंदिराच्या भोवती फारच चिकट झालं होतं. पाय घसरून पडायला नको म्हणून सावकाश मंदिरात प्रवेश केला. आतापर्यंत पूर्ण गडावर अशी एकच वास्तू मिळाली जिथे पाऊस वाऱ्यापासून संरक्षण मिळेल.  जगदीश्वराच्या दर्शनाने प्रसन्न वाटलं... बाहेर मुसळधार पाऊस आणि वारा असताना आतमध्ये मात्र उष्णता जाणवत होती . थोडा वेळ असच मंदिरात बसून राहावं असा दोघींनी विचार केला पण कपड्यातून पाझरणारा पाणी पूर्ण मंदिर ओलं करेल या विचाराने निघायचं ठरवलं.. मंदिराच्या बाहेर पाय ठेऊच नये असं वाटत होतं कारण धो धो बरसणारा पाऊस आणि वारा आम्हाला अजून भिजवायला लपुनच बसला होता अस वाटत होतं. एकदाचे तेथून बाहेर पडलो आणि महाराजांच्या समधीचं दर्शन घ्यायला गेलो. समाधी कडे जाताना आणि मंदिराच्या समोरील प्रवेशद्वाराच्या पायरीवर लिहलेली अक्षरे वाचली. ' सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुळकर'.....किती थोर माणूस असला पाहिजे हा ज्यांनी स्वराज्य निर्मिती अख्ख आयुष्य खर्ची घातलं, अभेद्य  अजिंक्य अशा किल्ल्यांची उभारणी केली आणि त्याची किंमत म्हणून महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पायरीवर चार अक्षरे. खरेच महाराजांच्या एका शब्दखातर जीव द्यायला तयार होते मावळे... महाराजांची आणि हिंदवी स्वराज्याची हीच खरी श्रीमंती होती जी, महाराजांनी देखील हारातील मोत्यांप्रामाणे जपली होती... आणि आताच्या परिस्थितीचा विचार केला तर एखाद्या सरकारी शाळेचे बांधकाम केले तर पहिल्याच पावसात गळती लागते... सर्वत्र फक्त भ्रष्टाचार माजला आहे. अगदी टोकापासून तळापर्यंत.... जाऊदे 
        समाधीच दर्शन घेऊन तिथेच थोडा वेळ बसलो. खरचं खूप शांत समाधान वाटत होतं. बाहेर पडलो पुन्हा जगदीश्वराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं आणि परत बाजारपेठेकडे यायला निघालो. टकमक टोकाकडे कॊनाची जायची हिम्मत नव्हती म्हणून आम्हीही परतीच्या प्रवासाला निघायचं ठरवलं. 
@छाया म्हात्रे
       रिटर्न तिकिट नसल्याने रोपवेने जाणं शक्य नव्हतं आणि गड उतरून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण परत जाणारे कोणीच दिसत नव्हतं, एका  काकांना विचारले की गड उतरताना माणसं आहेत का? "हो चिकार माणसं हायेत वाट ला,  जा भिऊ नका " काका म्हणाले. आणि आम्ही वाटेला लागलो.  आता थोडा पावसाचा जोर कमी झाला होता पण वारा मात्र तसाच अंगाला झोंबत होता. आता धुकंही थोडं कमी झालं होतं त्यामुळे किल्ल्यावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य अप्रतिम होत. महादरवाज्याजवळ पोहचलो तेथून मोठा दुधाळ धबधबा ओसंडून वाहत होता. त्याच्या प्रवाहात भिजण्याची हिम्मत नव्हती. इतका त्याला वेग होता. चोहीकडे कडे धुक्याची चादर, मध्येच रिमझिम करणारा पाऊस हात पसरून उंच ठिकाणी उभे असता स्वप्नात असल्यागत भासत होत.
        वाटेत ट्रिपसाठी आलेले अनेक लोक ग्रुप ग्रुपने भेटत होते. अगदी वर्षाच्या मुलापासून ते साठी ओलांडलेल्या लोकांपर्यंत... आम्हाला दोघींनाच जाताना पाहून  7-8 लोकांच्या गृपने विचारले की,"तुम्ही दोघीच आलात का ?, सोबत कोणीच नाही? .......अरे वा फारच डेरिंग वाल्या आहात... कुठून आलात ? अशा काही प्रश्नांची देवाण घेवाण करून आम्ही पुढे निघालो.. वाटेत  तीन ठिकाणी तो मोठा धबधबा मिळाला. एका ठिकाणी धबधब्यात पुन्हा भिजलो. पण पावसापेक्षा जास्त थंड पाणी  होत.......      
           सकाळपासून फक्त फिरत होतो किल्यावर पण काही खायला मिळले नाही त्यामुळे वाटेत असणाऱ्या दुकानात थांबून गरमागरम भजी खाल्ली आणि मक्के भाजून खायला घेतले. ऐटीत  खात खात निघालो पण दुसऱ्याच क्षणी तो माकडांनी येऊन हातातून कधी ओढून नेला ते कळलेच नाही. आम्ही फक्त एकमेकींकडे आणि आम्हाला हसणाऱ्या माणसांकडे बघत राहिलो.. ही अनोखी सफर अनुभवत किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. मागे वळून पाहिले माझा रायगड त्याच दिमाखात उभा होता. मनाशीच म्हटलं की पुन्हा एकदा असच येण होउदे रे...
         मगाशी म्हटल्याप्रमाणे जस यायचं प्लानिंग नव्हतं तस अर्थात जायचं प्लॅनिंगही नव्हतं. पायथ्यापाशी एकही लोकल गाडी नव्हती. होत्या त्या फक्त प्रायव्हेट... इथून महाड पर्यंत कस जायचं काही समजत नव्हतं. जवळच्या दुकानात चौकशी केली तर समजलं की पाऊस जोरात सुरू असल्यामुळे एस.टी ची फेरी परत होणार नाही, दोघीही एकमेकींकडे बघत राहिलो.  तसेच चालत चालत मुख्य रस्त्याला आलो तर रोप वे च्या बाजूने 3-4 मोठी मुले येताना दिसली, त्यांचं चालणं बोलणं पाहून ते खूप प्यायले आहेत असं जाणवलं . आता खूप भीती वाटू लागली. पाचाड पर्यंत कसतरी पोहोचायचं मग तेथून काहीतरी मिळेल अशी आशा होती. डोक्यात सहज विचार आला की, इतका मोठा गड चढलो ,फिरलो  ,उतरलो पण मनात अशी एकदा सुध्दा शंका आली नाही की आपल्याला कोणी काही केलं तर ... कोणी छेड काढली तर..... पण गड उतरताच अस का बरं वाटावं...गडावर ओळखीचं कोणी नसून देखील सगळे माझेच आहेत असं वाटत कारण आजही महाराजांचं अस्तित्व जाणवत...त्यांच्या विचारांचं, त्यांनी घालून दिलेल्या कायद्यांचं, संस्कारांचं अस्तित्व आहे....त्यांचा दरारा जाणवतो...पण गड उतरताच  एका स्त्रीच्या , मुलीच्या मनात अशी शंका का बरं निर्माण व्हावी...   
        रस्त्यातून जाणाऱ्या त्या प्रायव्हेट गाड्या , त्यातील लोक बघत होते..आम्ही मात्र एकमेकींना धीर देत रस्ता संपण्याची वाट बघत होतो. 1 किमी चा प्रवास कित्येक किमीचा वाटू लागला. पाचाड मध्ये पोहचताच जीवात जीव आला, एक  टमटम गडावरून येत होती. आम्ही हात केला . ज्या दुकानातल्या काकींशी आम्ही महाडला जाणाऱ्या गाडीविषयी चौकशी केली होती त्याच त्या टमटम मध्ये होत्या. आम्हाला पाहून त्यांनी  विचारले "पोरींनो कुठं जायचं हाय? ही गाडी महाड पर्यंत हाय येत असावं तर सोडू. एकच जागा हाय जमल तर बसा, आता काय भेटणार नाय बघा....तुम्ही हसाल पण खरच त्या क्षणी तिच्या तोंडून जिजाऊच बोलत असल्यासारख वाटलं. आम्ही अजून काही विचारण्याच्या आत टमटम मध्ये जाऊन बसलो. तिला आम्ही आमच्या प्रवासाविषयी सर्व सांगितलं,..…ती बोलत होती  " पोरींनो अस एकलं येत जाऊ नका आजकाल जमाना चांगला नाय राहिला, कधी कोणाची नजर फिरेल काय बी सांगता येत नाय... त्यांच्याशी चौकशी केली असता पायथ्याशी त्यांचं वडापावच दुकान आहे , ती नेहमी ये जा करतात.  त्या जवळच्याच गावात राहतात.  टमटम वाला त्यांच्या ओळखीचा होता.त्याची लास्ट ट्रिप होती पाऊस आहे म्हणून पॅसेंजर मिळाले नाही , त्यात त्यांची एसटी ही बंद म्हणून मग टमटमने निघाल्या. वाटेत अनेक प्रवाशी भेटले त्यांना घेत उतरवत आम्ही महाड पर्यंत पोहचलो आणि मोकळा श्वास घेतला . संध्याकाळचे 5 वाजले नाश्ता केला आणि घरच्या प्रवासाला लागलो, ते पुढची ट्रिप प्रॉपर प्लानिंग करून काढायची हे मनाशी पक्क करून.....

छाया म्हात्रे, रायगड

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा