श्रीवर्धन मध्ये खासदार सुनील तटकरे यांचा जनता दरबार : शेती रोजगार व पर्यटन या विषयांना प्राधान्य



 श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

 चक्रीवादळाने सर्वसामान्य व्यक्ती,  शेतकरी,  बागायतदार या सर्व घटकांना बाधित केलेले आहे. सरकारने दिलेली मदत सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. वादळाने बाधित झालेली शेती पूर्ववत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोकणातल्या शेतकऱ्याने, नारळ, सुपारी, काजू यांच्यासोबत अननस, व इतर मसाल्याच्या पदार्थांची निर्मिती करावी या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत असे खासदार सुनील तटकरे यांनी जनता दरबार प्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. श्रीवर्धन प्रांत कार्यालयात आयोजित जनता दरबार प्रसंगी सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील बाधीत शेतकरी व सर्वसामान्य जनता यांचे प्रश्न, समस्या व शासना कडून मिळणाऱ्या मदत निधी विषयी संवाद साधला आहे. पालकमंत्री अदिती तटकरे, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे,  तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी यांच्यासमवेत खासदार सुनील तटकरे यांनी तालुक्यातील सर्व कामांचा आढावा घेतला व त्यानंतर जनतेशी संवाद साधला. तालुक्यातील जनतेने आपले विविध प्रश्न सुनील तटकरे यांच्या समोर मांडले. जनता दरबार प्रसंगी मांडण्यात आलेल्या सर्व प्रश्नांचे समस्यांचे तटकरे यांच्याकडून निराकरण करण्यात आले. त्यानुसार संबंधित सर्व खात्यांना योग्य निर्देश देण्यात आले. जनता दरबार नंतर तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. विद्यमान सरकारने चक्रीवादळाने बाधित झालेल्या सर्व घटकांचा विचार करून योग्य मदत तात्काळ दिलेली आहे. रायगड मधील शेतकरी, बागातदार यांच्या प्रगतीला प्रधान्य क्रम देण्यात आलेला आहे. त्यानुसार रोजगार हमी योजना, तसेच आगामी तीन वर्षासाठी मोफत बियाणे मोफत देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. सदरच्या योजनेत बियांना  सोबत मोफत इतर शेतीपूरक बाबींची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. रायगड मधील शेतकऱ्यांनी नारळ-सुपारी सोबत इतर पिकांची लागवड करावी, शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा काम आम्ही निश्चित करू असे तटकरे यांनी सांगितले. श्रीवर्धनच्या सुपारीला बाजारात चांगली मागणी आहे त्यानुसार आम्ही अगोदरच्या सुपारीच्या जातीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा बदल न करता, दर्जेदार स्वरूपाची सुपारी बाजारात उपलब्ध होईल त्यानुसार मी प्रयत्नशील आहे. अननस, केळी, मसाल्याचे इतर दर्जेदार पदार्थ त्याच्या निर्मितीमध्ये शेतकऱ्याने पुढाकार घ्यावा जेणेकरून नारळ सुपारी आंबा या व्यतिरिक्त पिके रायगडच्या मातीमध्ये निर्माण होतील व त्यानुसार या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न उपलब्ध करून देतील. स्थानिक कोळी बांधवांचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील, चक्रीवादळांना बाधित झालेल्या सर्व बोटीना आम्ही जास्तीत जास्त मदत दिलेली आहे. आगामी काळात सुद्धा कोळी समाजाच्या पाठीशी मी ठाम पणे उभा आहे. त्यामुळे कोळी समाजाने कोणत्याही स्वरुपाची काळजी करू नये असे तटकरे यांनी सांगितले. श्रीवर्धन तालुक्यातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत व्हावा यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार मी महावितरणाच्या सर्व अधिकारी वर्गाची चर्चा केलेली आहे वादळाचा फटका अतिशय अतिशय जोरात होता त्यामुळे परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी मोठ्या प्रमाणातील मनुष्यबळाची गरज आहे त्यानुसार महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. श्रीवर्धन मधील परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी महावितरणची प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने महावितरणला मोठ्या स्वरूपात मदत केलेली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बाधित लोकांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तालुक्यातील बाधित सर्व लोकांना नुकसान भरपाई लवकरच मिळेल असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा