जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला 3 जून रोजी निर्सग चक्री वादळाचा धोका मच्छिमार बांधवांनी समुद्रात न जाण्याचे, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचे आवाहन
( प्रतिनिधी म्हसळा ) : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 4 जून २0 पर्यंत महाराष्ट्र पश्चिम किनारपट्टीला निर्सग चक्रीवादळाचा धोका असल्यामुळे मच्छिमार बांधवांनी या काळात समुद्रात जाऊ नये, ज्या बोटी समुद्रात गेलेल्या आहेत, त्यांनी लागलीच परत यावे तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांनुसार योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
निर्सग चक्रीवादळाच्या कालावधीत प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना व केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची प्रामुख्याने चक्रीवादळ येण्याच्या निकटपूर्वी, जेव्हा चक्रीवादळाची सूचना आणि इशारा देण्यात येतो, जेव्हा घरे रिकामी करण्याचा सल्ला देण्यात येतो, जेव्हा चक्रीवादळाने किनारपट्टी पार केलेली असते, अशा चार टप्प्यात विभागणी करण्यात येते.
चक्रीवादळ येण्यापूर्वी घ्यावयाची काळजी…
घराची तपासणी करावी. सुटे सामान सुरक्षित ठेवावे, दरवाजे व खिडक्या दुरूस्त करून घ्याव्यात, घराच्याजवळ असलेले वाळलेले लाकूड किंवा वाळलेली झाडे काढून टाकावीत. जोराच्या वाऱ्याने उडून जाऊ शकतात अशा ओंडक्यांच्या राशी, सुटया पत्र्याचे निवारे, सुटया विटा, कचऱ्याचे डबे, नामफलक वस्तू बांधून ठेवाव्यात. काही लाकडी फळया तयार ठेवाव्यात, त्यामुळे जर आवश्यकता पडली तर काचेच्या खिडक्यांना आच्छादित करता येईल. केरोसिनने भरलेला मोठया वाऱ्यात सुध्दा न विझणारा दिवा (कंदील) बॅटरीवर चालणारी विजेरी आणि पुरेसे (ड्रायसेल) शुष्क घट तयार ठेवावेत. मोडकळीस आलेल्या इमारती पाडून टाकाव्यात. ट्रान्झिस्टर (रेडिओ) करिता काही जास्त बॅटऱ्या ठेवाव्यात. संकटकालीन वापराकरिता कोरडे खराब न होणारे खाद्यपदार्थ नेहमीच तयार ठेवावेत, असे खबरदारीचे उपाय नागरिकांनी करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
जेव्हा चक्रीवादळ सुरू होते तेव्हा
हवामान विभागाच्या इशाऱ्यावर लक्ष ठेवावे. त्यामुळे चक्रीवादळाच्या आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहता येईल. अफवांवर लक्ष देऊ नये आणि त्या पसरवू नये, यामुळे घबराट निर्माण होणार नाही. लक्षात ठेवावे की, चक्रीवादळाची सूचना प्राप्त होणे, याचा अर्थ पुढील 24 तासांमध्ये धोका आहे. सावध राहावे. जेव्हा आपले क्षेत्र हे चक्रीवादळाच्या धोक्यात सापडते तेव्हा खाडी, किनारे किंवा किनाऱ्यालगतचे इतर पाणथळ क्षेत्रे यापासून दूर जावे, आपल्या पशुधनालाही (गायी, म्हशी, शेळी, मेंढी इत्यादी) सुरक्षित ठिकाणी न्यावे, उंचावरील ठिकाणी किंवा आश्रयस्थळी जाण्याचा मार्ग पाण्याखाली येण्यापूर्वीच बाहेर पडावे. वेळ घालवू नये आणि कोणताही धोका पत्करू नये.
जर आपले घर उंचावरील जागेवर सुरक्षितपणे बांधण्यात आलेले असेल तर घराच्या सुरक्षित भागात आश्रय घ्यावा. तथापि, प्रशासनाकडून जर ती जागा सोडण्यास सांगण्यात आले असेल तर तात्काळ प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. खिडक्यांच्या काचा बंद कराव्यात किंवा वाऱ्यापासून संरक्षण देणाऱ्या झडपा घालून ठेवाव्यात. बाहेरील दरवाजांना मजबूत योग्य टेकू द्यावा. शिजवल्याशिवाय खाता येईल, असे जादा खाद्यपदार्थ आणून ठेवावेत. पिण्याचे पाणी साठवून ठेवावे. मोठया वाऱ्यातसुध्दा न विझणारा कंदील, विजेच्या आणि इतर संकटकालीन प्रकाश देणारी उपकरणे चालू स्थितीत ठेवावीत आणि हाताशी ठेवावीत. लहान मुलांसाठी व प्रौढ व्यक्तींसाठी लागणारा विशेष आहार सोबत ठेवावा.जर चक्रीवादळाचा केंद्रबिंदू हा प्रत्यक्ष आपल्या घरावरून जात असेल तर, वारा शांत असेल आणि पाऊस अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ पडल्यास या वेळेत बाहेर पडू नये. कारण त्यानंतर लगेचच विरुध्द दिशेने जोरदार वारे वाहू लागतील. घरातील मुख्य विद्युत जोडणी बंद करावी. तसेच नागरिकांनी अशा परिस्थितीत शांतता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
Post a Comment