नव्या नियमावलीत शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  
मुंबई : प्रतिनिधी

 कोरोना महामारीमुळे सध्या सर्वकाही ठप्प आहे. यातच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी नव्या नियमावलीत शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिलेले आहेत. रविवारी झालेल्या बैठकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण देण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत समोर आला. याशिवाय, जूनमध्ये शालेय वर्षही सुरु झाले पाहिजे यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे.

रविवारी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली.त्यात मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार, आ. कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षणतज्ञही उपस्थित होते. 10 वर्षांत प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्‍न ऐकून घेतले तसेच ते सोडविण्यासाठी आश्‍वस्त केल्याचे आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले.

 यात शाळा आणि मुलांचे शिक्षण सुरूसाठी अनेक शक्यतांची पडताळणी करण्यात आली आहे. या बैठकी दरम्यान, जूनपासून शिक्षण सुरू करावे असे सांगण्यात आले आहे. यात शाळाच सुरू कराव्यात असे नाही. ऑनलाइन,ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरू करुन, मुलांचे वर्ष वाया जाऊ देऊ नये, असे सांगण्यात आले आहे. या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्‍न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा