पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये ५ कोटी तर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब व उत्तराखंड राज्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये प्रत्येकी ५० लाखांचे अर्थसहाय्य
म्हसळा (वार्ताहर)
निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचे पालन मार्गदर्शन व आशिर्वादाने संत निरंकारी मिशनचे प्रबंधक आणि सेवादार भक्तगण कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या देशभरातील लक्षावधी बंधु - भगिनींची सेवा करत आहेत. कोरोनाचा व्यापक संसर्ग रोखण्यासाठी दि. २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर हातावर पोट असलेले अनेक लोक आणि त्यांचे कुटुंबिय प्रभावित झाले. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याबाबत मिशनच्या देशभरातील ९५ झोन आणि त्याअंतर्गत असलेल्या सुमारे ३००० शाखांना मिशनच्या वतीने निर्देश देण्यात आले. निरंकारी मिशनतर्फे पंतप्रधान सहायता निधीमध्ये ५ कोटी तर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब व उत्तराखंड राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधींमध्ये प्रत्येकी ५० लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
निरंकारी मिशनचे भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवक मदत कार्यासाठी पुढे सरसावले असून त्यांनी लाखो लोकांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. या जीवनावश्यक वस्तूमध्ये लॉकडाऊन कालावधीत पुरेल इतके तांदुळ, गव्हाचे पिठ, डाळ, मिठ, साखर, तेल, मसाला बिस्किटे, चहा अशा विविध वस्तूंचा समावेश होता. या व्यतिरिक्त दररोज सुमारे ०१ लाख लोकांना ताजे जेवण वितरीत केले जात आहे. देशभरात ०१ लाखाहुन अधिक कुटुंबांना आत्तापर्यंत हे राशन वाटप करण्यात आले आहे. मिशनच्या वतीने पंतप्रधान सहायता निधीमध्ये ५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असून महाराष्ट्रासह हरीयाणा, पंजाब, उत्तराखंड आदी राज्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये प्रत्येकी ५० लाख रुपये इतके अर्थसहाय्य दिले आहे. मिशनच्या या महान मानवतावादी सेवेचे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटद्वारे कौतुक केले असुन संबंधित मुख्यमंत्री महोदयांनीही मिशनच्या योगदानाची प्रशंसा केली आहे.
मिशनच्या कित्येक शाखांकडून पोलीस विभाग, आरोग्य विभाग, प्रशासकीय सेवांमध्ये संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांसहीत गरजू लोकांना भोजन आणि चहापान देण्याची सेवा करत आहेत. मिशनच्या जबलपुर शाखेने ४२०० मास्क तयार करून संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
संत निरंकारी चँरिटेबल फाऊंडेशनच्या वतीनेही वर्तमान परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरतील असे विविध उपक्रम राबवित आहेत. फाऊंडेशनच्या वतीने एक हेल्पलाईन सुरु करण्यात आली असुन त्याद्वारे नागरीकांना आरोग्यविषयक सल्ला व सहकार्य केले जात आहे. फाऊंडेशनद्वारे चालविण्यात येणाऱ्या शाळा व संत निरंकारी सत्संग भवन कॉरंटाईनसाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. शिवाय वैश्विक आणीबाणीच्या काळात रक्तदानाचे उपक्रम राबविले जित आहेत. दील्लीसह देशातील शेकडो शहरांमध्ये मिशनच्या वतीने मदतकार्य चालू असून महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नागपुर, गडचिरोलीसह राज्यभरातील मिशनच्या शाखांद्वारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे.
कोरोना संकटाच्या दरम्यान सदगुरु माताजींनी भक्तगणांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, सेवा करताना सर्वांनी आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. या विश्वातील समस्त मानवमात्र आपले बंधु- भगिनी आहेत आणि त्यांची सेवा करुन आपण कोणावर उपकार करत नाही. मिशनने या संकटमय परिस्थितीत देशाबरोबर उभे राहाण्याची प्रतिज्ञा केलेली असुन हे संकट लवकरात लवकर दुर व्हावे म्हणून मिशनच्या वतीने प्रार्थना करण्यात येत आहे.
Post a Comment