श्रीवर्धन : विजय गिरी
कोकणातील किनारपट्ट्यांवरील प्रमुख व्यवसाय हा मासेमारी असून सद्य:स्थितीत राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे तसेच क्यार चक्रीवादळामुळे कोकणातील किनारपट्टीवरील मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मासेमारीचा हंगाम सुरु झाल्यानंतरच्या तीन महिन्यातील दोन महिने विविध कारणांमुळे वाया गेल्याने किनारपट्टीवरील मच्छिमार हवालदिल झाले आहेत. अशा वेळीस प्रशासनाने मच्छिमारांच्या पाठीशी खंबीर उभे राहून तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आज श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी मत्स्य व्यवसाय आयुक्त श्री. जाधव यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत शहापूरचे आमदार दौलत दरोडा व विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा देखील उपस्थित होते.
मच्छिमारांना प्रत्येक नौकेला एका खेपेसाठी डिझेल, बर्फ, अन्न धान्य,असा अंदाजे ६० हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येत असतो. परंतु, मागील तीन महिन्यांपासून समुद्रात सुरु असलेल्या चक्रीवादळामुळे मच्छिमारांना मासे न पकडताच किनाऱ्याला बोटी घेऊन यावे लागल्याने त्यांचा दार खेपेसाठी होणार खर्च निव्वड वाया गेला आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगत असलेल्या बोटींचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मासे न पकडताच आपल्या नौका किनाऱ्यावर लावल्याने मच्छिमारांचे आर्थिक कंबरडेच मोडले गेले आहे. त्याचबरोबर बोटींवर काम करणाऱ्या हजारो कामगारांचा रोजगार देखील बुडाला आहे. त्यांचे परिवारास आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारदेखील मागील दोन ते तीन महिन्यांपासून आर्थिक परिस्थितीने गांजला आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या नुकसानीचा मोबदला त्यांना तात्काळ मिळावा. अशी मागणी श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी निवेदनाद्वारे मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
Post a Comment