खारगाव (बु)ग्रामपंचायत निवडणुकीत रंगणार तिरंगी सामना ; शिवसेनेचे दोन सदस्य बिनविरोध


म्हसळा (बाबू शिर्के)
म्हसळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या  महत्त्वाच्या असलेल्या खारगाव (बु) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून अपेक्षेप्रमाणे तिरंगी सामना रंगणार आहे.   सरपंचपदाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार उभे असल्याने सरपंचपदाची निवडणूक बहुरंगी व लक्ष्यवेधी होणार आहे.  प्रथमच सरपंचपदाचा उमेदवार थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने ही निवडणूक  लक्ष्यवेधी ठरणार आहे.या निवडणुकीत शिवसेनेतर्फे माजी उपतालुका प्रमुख, मावळते सरपंच अनंत नाक्ती, राष्ट्रवादी कडून दीपक म्हात्रे तर काँग्रेस कडून नीलम वेटकोळी सरपंच पदासाठी आपले नशीब अजमावणार आहेत. या ग्रामपंचायतचा इतिहास पाहता या ग्रामपंचायतीवर मागील वीस वर्ष सेनेची एकहाती सत्ता आहे.  शिवसेनेचे उमेदवार अनंत नाक्ती यांनी बारा वर्ष या ग्रामपंचायत मध्ये सरपंचपद भोगले आहे. तसेच शिवसेनेचे दोन सदस्य बिनविरोध आले आल्याने सध्यातरी त्यांचे पारडे जड मानले जात आहे. परंतु राष्ट्रवादीने सुद्धा ह्या ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन घडवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर यांनी या ग्रामपंचायतमध्ये विशेष लक्ष घातले असल्याने या ग्रामपंचायतीवर आमचाच सरपंच निवडून येणार असे ते ठामपणे सांगत आहेत.तर म्हसळा तालुक्यात शिवसेना आणी काँग्रेस यांची युती आहे. मागील झालेल्या ग्रामपंचायतमध्ये या दोन्ही पक्षांनी एकत्र लढत मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केले होते .परंतु या ग्रामपंचायतमध्ये युतीची बोलणी फिस्कटल्याने काँग्रेस कडून नीलम वेटकोली रिंगणात उतरल्या आहेत त्यांनी सुद्धा आपल्या विजयाचा दावा केला आहे .या निवडणुकीत कोण बाजी मारणार ते येत्या 24 फेब्रुवारीला मतदार ठरवणार असून हि निवडणूक रंगतदार ठरणार हे नक्की आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा