संत निरंकारी मिशनमार्फत 'स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान ; दिवेआगर समुद्राकीनारी होणार स्वच्छता

संत निरंकारी मिशनमार्फत 'स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान ; दिवेआगर समुद्राकीनारी होणार स्वच्छता

संत निरंकारी मिशनमार्फत अमृत परियोजने अंतर्गत
‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियान
दिवेआगर समुद्राकीनारी होणार स्वच्छता 
खरसई: - प्रसाद पारावे 
संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी, 2023 रोजी ‘अमृत परियोजने’ अंतर्गत ‘स्वच्छ जल - स्वच्छ मन’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

‘जल संरक्षण’ आणि ‘जल बचाव’ करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते कार्यान्वित करणे हा या परियोजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये जलाशयांची स्वच्छता आणि स्थानिक जनतेमध्ये जागृती अभियान राबवून जनसामान्यांना प्रोत्साहित करणे हा या परियोजनेचा केंद्रबिंदू आहे.

बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान यांची सुरवात प्रमुख आहेत. त्यांच्याच शिकवणूकीतून प्रेरणा घेत दरवर्षी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून यावर्षी अमृत परियोजनेचे आयोजन करण्यात येत आहे.

संत निरंकारी मिशनचे सचिव आदरणीय श्री.जोगिन्दर सुखीजाजी यांनी या परियोजनेविषयी विस्तृत माहिती देताना सांगितले, की ही परियोजना संपूर्ण भारतभरात 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 730 शहरांमध्ये जवळपास 1000 ठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार द्वीप समूह, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दीव दमन, दिल्ली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडु, तेलंगाना, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल इत्यादींचा समावेश आहे.

या परियोजनेअंतर्गत निरंकारी मिशनचे सुमारे 1.5 लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवतील तसेच जल संरक्षणाची प्रेरणा देतील. मिशनच्या जवळ जवळ सर्व शाखा यामध्ये सहभागी होतील आणि आवश्यकतेनुसार अनेक शाखा निर्धारित क्षेत्रामध्ये एकत्र येऊनही सामूहिक रूपात हा उपक्रम राबवतील.

‘अमृत परियोजने’ अंतर्गत भारताच्या दक्षिण क्षेत्राकडील तटीय क्षेत्रे ज्यामध्ये सूरत, मुम्बई ते गोवा आणि कोंकण किनारपट्टी, मलबार तटाकडील कर्नाटक, केरळ राज्यांच्या तटीय रेखा व अरबी समुद्राच्या पश्चिमी घाटाकडील सीमा तसेच कोरोमंडल तटाच्या दक्षिणपूर्व तटीय क्षेत्रांना स्वयंसेवकांच्या चमूंकडून कव्हर केले जाईल. या व्यतिरिक्त पूर्व किनाऱ्यावरील बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडील कावेरी डेल्टाचा भागही कव्हर करण्यात येणार आहे. 

झोन खरसई (रायगड) 40-अ मधील सेक्टर खरसई च्या खरसई, भरडखोल, श्रीवर्धन, वडवली व संदेरी ब्रॅंच अंतर्गत दिवेआगर समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. त्यामध्ये स्थानिक निरंकारी सेवादल तसेच अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नद्या :- या अभियाना अंतर्गत उत्तरेकडील ब्यास, गंगा, यमुना आणि घाघरा, मध्य भारतातील चंबळ, बेतवा, नर्मदा, कृष्णा, तापी, सोन नदी, पश्चिमेकडील साबरमती, माही, तवा, पूर्वेकडील महानदी, गोदावरी आणि दक्षिणेकडील कृष्णा, कावेरी, कोल्लिडम यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

समुद्र किनारे आणि नद्यांच्या स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या प्रणालींचा समावेश :-  प्रामुख्याने प्राकृतिक जलसाठ्यांच्या क्षेत्रात पडलेला प्लास्टिक कचरा, अपशिष्ट (निरुपयोगी) पदार्थ, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ इत्यादींचा निपटारा करुन समुद्रकिनारे, घाट आणि नदीकिनाऱ्यांची स्वच्छता मिशच्या स्वयंसेवकांकडून केली जाणार आहे.

या व्यतिरिक्त प्राकृतिक व कृत्रिम जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ इत्यादि जाळीयुक्त काठ्यांचा वापर करुन दूर करणे, रस्ते व आजुबाजुच्या क्षेत्रांमध्ये फिरण्यासाठी व चालण्यासाठी उपयोगात आणली जाणारी ठिकाणे सुशोभित करण्यासाठी वृक्ष व झुडपांचे रोपण करणे इत्यादी कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत ज्यायोगे पर्यावरण हरित व सुंदर होईल.

जनजागृती अभियान :- प्राकृतिक जलाशय असोत किंवा मानवनिर्मित, सर्वच क्षेत्रांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे. या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी मुख्यत: ‘जल संरक्षण’ आणि उत्तम जलप्रथांच्या संदर्भात संदेश दर्शविणारी घोषवाक्ये, बॅनर्स, होर्डिंग्ज इत्यादिंचे प्रदर्शन तसेच साफसफाई अभियान राबविताना पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्व आणि संरक्षणाच्या प्रति जागृती निर्माण करणे, रॅली, मार्च, स्थानिक क्षेत्रांमध्ये पाण्यासाठी पदयात्रा करणे, जल संरक्षणाबाबत गीतांचे सादरीकरण, पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत जागृती, लोकनृत्ये, गीत आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम व सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जल संरक्षण’विषयी जागरुकता इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.

ही परियोजना पर्यावरण संतुलन, प्राकृतिक सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी केला जाणारा एक प्रशंसनीय व स्तुत्य प्रयास आहे. वर्तमान काळात आपण अशा प्रकारच्या लोक कल्याणकारी परियोजना राबवून आपल्या या सुंदर धरतीला नुकसानीपासून वाचवू शकतो तसेच प्राकृतिक संसाधनांच्या अनावश्यक वापरावरही अंकूश लावू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा