म्हसळा तालुक्यात ग्रामीण भागातील रस्त्यांचे बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे,बांधकाम प्रशासनाचे दुर्लक्ष ? ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
बाबू शिर्के : म्हसळा
तालुका खेडे गावातील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करून आणि अथक प्रयत्नांनी म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात आमदार,खासदार,मंत्री महोदयांनी शिफारस केलेले डांबरीकरण रस्त्याचे कामांना मंजुरी मिळाली आहे परंतु मंजूर कामांची संबंधीत ठेकेदार करवी करण्यात आलेली कामे अत्यंत नित्कृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत या कामांवर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने दोन दिवसांत भापट-कोलवट रस्त्याचे काम उखडले आहे या हलगर्जीपणाला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तालुक्यातील भापट कोलवट रस्त्यासाठी जिल्हा परिषदेच्या नियोजन विभागा मार्फत 20 लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्री आदिती तटकरे यांचे शिफारसीने मंजूर करण्यात आला होता.पावसाची सुरुवात झाली असताना दोन दिवसांपूर्वी संबंधित बांधकाम ठेकेदाराने रस्त्यावर खडीडांबराचा कच्चा माल टाकुन घिसाडघाई करून अंदाजे 400 ते 600 मीटर रस्त्याचे काम केले आहे हे काम इतके नित्कृष्ट दर्जाचे आहे, अवघ्या दोन दिवसाचे पावसाने रस्ता वाहून जाण्याचा प्रकार निदर्शनास आहे. अशाच प्रकारे उकशीचाकोंड गाव अंतर्गत रस्ता, खामगाव देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याचे ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिले आहे.
पावसाळा जवळ आला की डांबरीकरण करण्याच्या कामांना 15 मे नंतर बांधकाम खात्याकडून काम करण्यास मज्जाव केला जातो असे असताना सदरची कामे ठेकेदाराने घाईघाईने मलमपट्टी करून केली आहेत त्याचेवर संबंधित बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.वास्तविक पाहता शासन अटी व शर्थी नुसार बांधकाम अभियंता यांनी रस्ता तयार करण्याचे निकषानुसार बांधकाम करून घेणे गरजेचे असताना मंजुर कामाच्या रकमेतील जास्तीत जास्त मलिदा खाण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या रस्त्यांची कामे नित्कृष्ट दर्जाची करण्यात येत आहेत. ठेकेदार आणि बांधकाम अभियंता संगणमताने नागरिकांच्या डोळ्यात दिवसाढवळ्या अंजन टाकुन शासनाची पुरती फसवणुक करीत असल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कामाची पाहणी करून ठेकेदाराला कामाचे बिल अदा न करता योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी कोळवट, भापट, ताम्हणे शिर्के ,चिरगाव ,रातविणे , उकशीचा कोंड, खामगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांनी नित्कृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,जिल्हा परिषदेचे कृषि सभापती बबन मनवे, तालुक्याचे लोकप्रतिनिधी सभापती छाया म्हात्रे, उपसभापती संदिप चाचले यांचेकडे केली आहे. सन 2020 /21 या आर्थिक वर्षात म्हसळा तालुक्यात सर्वच गाववाडीत झालेल्या अंतर्गत डांबरीरस्ते कामाची शासन स्तरावर नित्कृष्ट दर्जाचे कामांची तपासणी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Post a Comment