तलाठी,ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचा पथकात समावेश
श्रीवर्धन तालुक्यासाठी चार तपासणी पथकांची निर्मिती
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्याच्या हेतूने राज्य सरकार ने टाळे बंदी चा मार्ग निवडला आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोनाची प्रचंड लाट आल्याने प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजनचा पुरवठा, रेडमीसीवर इंजेक्शन, व्हेंटिलेटर या सर्व बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी प्रशासन ला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला त्याचे काही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे, विविध यात्रा जत्रा, तसेच घरगुती कार्यक्रम यामध्ये मोठ्या स्वरूपात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः एप्रिल व मे महिन्यात लोकांनी लग्नाचा धुमधडाका सुरू केला आहे . शासनाच्या निर्देशानुसार लग्नसोहळ्यासाठी पंचवीस व्यक्तींना परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र जनता शासन निर्णय धाब्यावर बसून सर्व नियमांचे उल्लंघन करत धुमधडाक्यात हळदी व लग्न सोहळ्याचे आयोजन करत आहे. पर्यायायाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुद्धा तितक्याच जोराने झाल्याचा दिसून येत आहे. त्या कारणास्तव रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशानुसार श्रीवर्धन तालुका प्रशासनाने पाच भरारी तपासणी पथकाची निर्मिती केली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागासाठी चार पथके व शहरासाठी एक पथक काम पाहणार आहे. तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील व कृषी पंचायत समिती तहसील या विभागातील एक वरिष्ठ सहाय्यक यांचा पथकामध्ये समावेश असेल. निर्माण केल्या गेलेल्या सर्व पथकांवर वर श्रीवर्धन मधील नायब तहसीलदार रामभाऊ गिरी यांचे नियंत्रण असेल. विवाह तपासणी पथक विवाहाच्या ठिकाणी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे होत आहे की नाही याची पाहणी करेल त्यासोबत शासन आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात रुपये पन्नास हजाराचा दंड आकारणार आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यातील वधू व वर कुटुंबांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.
शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहे. विवाह सोहळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचे माध्यम व साधन बनत आहेत. शासन नियमांचा भंग करून विवाहस्थळी गर्दी जमल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. कारवाईसाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे..... अमित शेडगे ( प्रांताधिकारी श्रीवर्धन )
रायगड जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार श्रीवर्धन तालुक्यात विवाह तपासणी साठी ग्रामीण विभागासाठी चार व शहरी विभागासाठी एक असे एकूण पाच पथके निर्माण केली आहेत. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. कायद्याचा भंग करणारा विरोधात दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली जाईल... सचिन गोसावी( तहसीलदार श्रीवर्धन)
Post a Comment