मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
यावर्षी मान्सुन समाधानरक असल्याने जून महीन्यापासुन सुरु झालेल्या पावसाने भातशेतीच्या पेरणी व लावणीची कामे वेळेत पुर्ण झाल्याने भातपिके जोमाने वाढली होती.शेतकरी भातशेतीकडुन मोठ्या अपेक्षा ठेऊन आहेत.शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ शिवारात डोलणाऱ्या पिवळ्या सोन्याच्या रुपाने दिसु लागले होते.भाताचे पिक आता तयार झाल्याने शेतकऱ्यांची कापणीसाठी लगबग सुरु झाली होती.पण या वर्षीही गेले दोन तिन दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाचा मोठा फटका भात,वरी,नाचणी या पिकांना बसल्याने या पावसाने शेतकऱ्यांच्या तयार पिकांवर पर्यायाने वर्षभराच्या नियोजनाच्या स्वप्नांवर नांगर फिरवला आहे त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील भातशेती शेवटच्या टप्प्यात असताना परतीच्या पावसाने पिके काळी पडणे,पाण्यात पडून तयार लोंबीतील भात कुजणे, कीड पडणे अशा अनेक आव्हानांना सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणार आहे.परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात शेतीची धुळधाण केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे.पेरणी,लावणी,खत व मशागतीसाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर आणखी वाढला असून कोरोना महामारीने झालेली टाळेबंदी व निसर्ग चक्रीवादळाने आधीच उध्वस्त झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांपुढे कर्जाची परतफेड कशी करायची आणि वर्षभर प्रपंच कसा चालवायचा हा मोठा प्रश्न पडला असुन बळीराजाचे डोळे आता माय बाप शासनाकडे लागले आहेत.
Post a Comment