नारळ व सुपारीची रोपे लावल्यानंतर ती उत्पन्नावर येण्यासाठी कमीत कमी आठ वर्षे लागतात. हीच अवस्था आंबा, काजू बागायतदारांची देखील आहे. आंब्याची कलमे किंवा काजूची कलमे लावल्यानंतर ती उत्पादनात येण्यासाठी जवळ-जवळ सात ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील नारळ-सुपारी बागायतदार तसेच आंबा, काजू बागायतदार दहा वर्ष मागे गेले असे म्हणायला काही हरकत नाही.
आता बागायतदारांसमोर मोठा यक्षप्रश्न आहे, तो म्हणजे लागवडीसाठी रोपे आणायची कुठून ? कारण प्रत्येक जण आपल्या वाडीमध्ये सुपारीची व नारळाची रोपे तयार करत असतो. मात्र यावेळी मोठी रोपे या लहान रोपांवर पडल्यामुळे लहान रोपांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता परतीचा पाऊस सुरू आहे. आठ दिवसानंतर पावसाळा संपेल व नारळ सुपारीच्या बागांमध्ये लागवडीच्या कामाला सुरुवात करावी लागेल.
वादळानंतर झालेल्या आढावा बैठकीमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी सुपारी संशोधन केंद्र दापोली तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त रोपे तयार करून शेतकऱ्यांना मोफत देण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र कृषी विभागाकडून अद्यापही कोणतीही माहिती किंवा काय योजना आहेत याबाबत बागायतदारांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. बागायतदारांच्या झाडांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे यावर्षी आंबा, काजू त्याचबरोबर नारळ व सुपारी यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. तरी कृषी विभागाने बागायतदारांना लवकरात लवकर लागवडीसाठीच्या योजनांची व रोपे कोठे उपलब्ध असतील याबाबतची माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी बागायतदारांमधून केली जात आहे.
Post a Comment