म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
राज्यात महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर झालेल्या मंत्रीपदाच्या खाते वाटपात श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग, खनिकर्म, क्रीडा व युवक कल्याण, पर्यटन, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी कु.आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे. याबाबतचे पत्रक आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी काढले असून राज्यपालांच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागाचा राज्यमंत्री पदाचा कार्यभार कु.आदिती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांकडील माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय या दोन महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रीपद कु.तटकरे यांच्याकडे देण्यात आल्याने आता त्यांच्याकडे राज्यमंत्रीपदाच्या एकूण आठ विभागाचा पदभार आला आहे. मंत्रिमंडळातील युवा मंत्री म्हणून कु.तटकरे यांनी आपल्या कार्यशैलीची छाप मुख्यमंत्र्यावर सोडली असल्याने त्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे.
Post a Comment