पाभरे ग्रामपंचायतीला वृक्ष लागवडीचा विसर ; हजारो झाडे ग्रापच्या आवारातच मृतावस्थेत



वृक्षारोपण संकल्पनेचा उडाला बोजवारा

● सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांचे दुर्लक्ष

● संबंधितांवर कारवाईची मागणी

म्हसळा :श्रीकांत बिरवाडकर

   महाराष्ट्रशासनाने मोठा गाजावाजा करून 33 कोटी वृक्ष लागवड ही मोहीम हाती घेतली होती ही मोहीम काही ठिकाणी सत्यात उतरवली परंतु काही ठिकाणी या मोहिमेला हरताळ फासण्यात आला असून प्रत्यक्ष झाडे न लावताच खर्च दाखवून मोहीम फक्त कागदावरच पूर्ण केली असून वृक्ष लागवडीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च दाखवून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा काम काही लोकांनी केला आहे. 
म्हसळा तालुक्यातील पाभरे ग्रामपंचायत मधे
शासनाची झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम फक्त कागदावरच दाखवली गेली असून ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यात ताळमेळ नसल्याने सामाजिक वनीकरण विभागाकडुन घेतलेली हजारो झाडे आजही ग्रामपंचायतच्या आवारात सुकत असून मृतावस्थेत पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पाभरे ग्रामपंचायत मधे वृक्षारोपण संकल्पनेचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे शासन विविध योजनांच्या माध्यमातून वृक्षारोपण करून संवर्धन करण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र पाभरे ग्रामपंचायतीला वृक्षारोपण करण्याचा विसर पडलेला दिसून येत आहे. 
संबंधित घटनेबाबत ग्रामपंचायतीत चौकशी केली असता सर्वजण एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून पळवाट काढत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कारभाराचे तीन तेरा वाजले आहेत असेही काही येथील सुशिक्षित नागरिक सांगत आहेत. 
जून महिना संपून आज पाच महिने झाले आहेत तरी अद्यापही झाडे लावली नसल्याने ग्रामपंचायतिचा निष्काळजीपणा उघड होत आहे. तर सत्ताधारी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे बोलले जाते. आतापर्यंत अनेक ग्रामसभा, मासिक सभा, झाल्या आहेत यामध्ये ही माहिती कधी उघड केली गेली नाही किंवा सत्ताधारी यांच्याकडून याबाबतीत काहीही पावले उचलली गेली नाहीत तसेच विशेष म्हणजे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांचा ग्रा.पंचायत तपासणी दौरा झाला आहे या अधिकारी वर्गाने सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच आवारात हजारो झाडे मृतावस्थेत असल्याबाबत कधीही चौकशी केली नाही. यावरून पाभरे ग्रामपंचायत कमिटी सह तालुक्यातील शासकीय अधिकारी वर्गाला सुद्धा वृक्षारोपण संकल्पनेचे महत्व किती आहे हे दिसून येते.

 पाभरे ग्रामपंचायत मधे झाडे लावली गेली नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे. हजारो रोपे ग्रामपंचायत कार्यालय व शाळेच्या पटांगणात मृतावस्थेत आहेत. या सर्व परिस्थितीला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक हेच जबाबदार आहेत. या लोकांनी नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे होते तसेच जनजागृती करणे गरजेचे होते. मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा ही कित्येक झाडे शाळेच्या आवारात मरून गेली होती. त्या मेलेल्या झाडांची विल्हेवाट शाळेतील मुलांनी लावली. ग्रामपंचायतच्या सर्व निष्काळजीपणा मुळे शासनाचे लाखो रुपये वाया जात आहेत.
श्री.प्रकाश रायकर, ग्रामपंचायत पाभरे - चाफेवाडी ग्रामस्थ

आम्ही ग्रामपंचायत च्या मागणीनुसार रोपे पुरविण्याची जबाबदारी आमची होती ती आम्ही पार पाडली ती रोपे लावण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत ची आहे तसेच शासनाच्या नियमानुसार या सर्व प्रक्रियेवर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण आहे. त्यांनी याबाबतीत लक्ष घालून चौकशी केली पाहिजे.
श्री.अंबावकर , सामाजिक वनीकरण अधिकारी म्हसळा तालुका

ग्रामपंचायत मधे पुरविण्यात आलेली झाडे कोणत्या निधीतून आणली आहेत याबाबत काही कल्पना नाही तसेच ही रोपे लावली गेली नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे.
श्री.जयवंत अवेरे, सदस्य ग्रामपंचायत पाभरे

पाभरे ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये रोपे लावण्यासाठी आणली होती तसेच ही रोपे ग्रामस्थांना घेऊन जायला सांगितले होते परंतु काही ग्रामस्थांनी रोपे नेली नाहीत.
श्री.मच्छिन्द्र पाटील , ग्रामसेवक पाभरे ग्रामपंचायत

पाभरे ग्रामपंचायत येथील वृक्षलागवड संदर्भात ग्रामसेवकाकडून माहिती घेऊन चौकशी करतो.
श्री.वाय.एम.प्रभे
गटविकास अधिकारी - पंचायत समिती म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा