श्रीवर्धन : प्रतिनिधी
श्रीवर्धन शहरातील जीवना कोळीवाडा परिसरात अत्यंत जुने असे जीवना बंदर आहे . सध्याच्या नवीन भाषेत जेट्टी म्हणतात . १९६८ सालापर्यंत श्रीवर्धनला येण्यासाठी रस्ते वाहतूक आस्तित्वात नव्हती . कारण आता असलेला साई मोर्बा रस्ता तेव्हा नव्हता . गोरेगावच्या नदीवर पुल नसल्यामुळे तेथुन होडीने पलीकडे यावे लागत असे . तेथे आल्यावर खाजगी वाहन मिळाले तर ठीक नाहीतर बैलगाडी किंवा पायी जाण्याशिवाय पर्याय नसे . त्यामुळे मुंबईला जाणारे किंवा येणारे प्रवासी जलमार्गाने येणे पसंत करीत असत . त्यावेळी मुंबई भाऊचाधक्का येथुन बोट गोव्यापर्यंत चालत असे ती बोट मुरुड , श्रीवर्धन , हर्णे , रत्नागिरी बंदरात थांबून प्रवासी चढ उतार करीत असे . प्रवाशांसोबत मालाची वाहतूक सुद्धा बोटीने होत असे . श्रीवर्धन हे त्यावेळी मुख्य बंदर म्हणून प्रसिध्द होते . पण रस्ते वाहतूक सुरु झाल्यानंतर बंदराचा वापर मासळी उतरविण्यासाठी होवु लागला . मच्छिमारी करणाऱ्या बोटी या ठिकाणाहून ये जा करतात ओहोटीच्या वेळी या ठिकाणी खोल पाण्यात असलेला एकच धक्का उपयोगात येतो . भरतीच्या वेळी तीन चार ठिकाणी बोटी उभ्या करता येतात . आज मुंबई गोवा महामार्गावर वाढलेला वाहतुकीचा प्रचंड ताण पाहता जलमार्गानेि प्रवासी व मालवाहतूक जलद स्वस्त व फायदेशीर ठरणार आहे . भविष्यात पर्यटन वाढीसाठी जलवाहतूक पर्यटकांना आनंददायी व आकर्षक ठरणार हे निश्चित . परंतु श्रीवर्धनचे जीवना बंदर सध्या तरी चांगल्या अवस्थेत नसल्याचे पाहायला मिळत आहे महाराष्ट्र मेरीटाइम बोडकडून दुरुस्तीचे थातुरमातुर काम केले जाते पण कायमस्वरूपी टीकत नसल्याने पुन्हा बंदरांची अवस्था जैसेथे होते . श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून येण्याअगोदर पालकमंत्री असताना व निवडून आल्यानंतर सुनील तटकरेनी जीवना बंदराच्या विकासासाठी निधी देणार असल्याच्या घोषणा केल्या पण आजपर्यंत कोणताही मोठा निधी बंदर विकास व नूतनीकरण करण्यासाठी मिळालेला नाही.
पर्यटनासोबत मासेमारी मुख्य व्यवसाय...
जीवना बंदराकडे जाण्याआधी स्वयंभु जीवनेश्वर हे शंकराचे मंदिर आहे त्यावरूनच या बंदराला जीवना बंदर हे नाव पडल्याचे सांगितले जाते . श्रीवर्धन तालुका सध्या पर्यटनस्थळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शहरात प्रसिध्द आहे . श्रीवर्धन येथे पर्यटनासोबत मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे . त्यामुळे भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून तसेच मच्छिमारी व्यवसायाला अजुन चालना मिळण्यासाठी जीवना बंदराचा विकास होणे काळाची गरज आहे सध्या या बंदरातून सागरी गस्तीसाठी जाणाच्या पोलिसांच्या स्पीडबोट देखिल ये जा करत असतात . भविष्यात बागमांडले ते बाणकोट हा भव्य पुल वाहतूकीसाठी खुला होणार असल्याने श्रीवर्धन तालुक्याचे महत्व जास्तीच वाढणार आहे . तरी राज्याच्या व केंद्रशासनाच्या बंदर विकास खात्याकडून जीवना बंदराच्या विकासासाठी भरगोस निधी मिळण्याची वाट श्रीवर्धनचे मच्छिमार बांधव व नागरिक पाहात आहेत .
Post a Comment