14 ते 16 मे दरम्यान 40 ते 60 किमी वेगाने वारे; समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार
मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन
टीम म्हसळा लाईव्ह
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पूर्व मध्य अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे वादळसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रायगडातील समुद्र व खाडी किनार्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशार्यानुसार 14 ते 16 मे यादरम्यान 40 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, नागरिकांनी समुद्र किनार्यावर पोहण्यासाठी जाऊ नये अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या असून, समुद्र व खाडी किनार्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच वादळ किनार्यावर येण्याची शक्यता विचारात घेऊन सर्व विभागांना आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करुन ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. वूडकटर, जेसीबी, बॅटरी, जनरेटर, शोध व बचाव पथक आदी तत्पर ठेवण्यात यावे, वादळ व अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी आपल्या आदेशात जारी केल्या आहेत.
Post a Comment