जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी टाळून प्रशासनास सहकार्य करावे-मुख्याधिकारी मनोज उकिर्डे



बाबू शिर्के : म्हसळा 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि वेळीच रोख आणण्यासाठी म्हसळा नगर पंचायतीने पंचायत हद्दीतील चिंचोळ्या जागेत असणारी भाजी मंडई सद्या तात्पुरत्या स्थितीत अंजुमन हायस्कूलचे प्रांगणातील प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय 15 मे पासुन घेतला आहे.आज भाजी विक्रीसाठी अंजुमन हायस्कूल येथे एकच गाडी आली असल्याने ग्राहकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी न करता कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन म्हसळा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी केले आहे.नगर पंचायत प्रशासनाने शहरातील भाजीपाला विक्री मंडई स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असता त्याला मंडईतील घाऊक व किरकोळ भाजी विक्रेत्यांनी विरोध करून दोन दिवस भाजीपाला विक्री न करण्याचा निर्णय घेऊन बंड पुकारला आहे.मात्र नगर पंचायत प्रशासन जनआरोग्याची काळजी घेत त्यांचे निर्णयावर ठाम असल्याने जनतेची गैरसोय होऊ नये म्हणुन शहरातील काही स्थानिक व्यावसायिकांच्या मदतीने आज नव्याने भाजीपाल्याची एक गाडी विक्रीसाठी उपलब्ध झाली असल्याचे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे.भाजी विक्रीची एकच गाडी आल्याने ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून म्हसळा नगर पंचायत प्रशासनाने त्यांचे कर्मचारी व पोलिसांची मदत  घेऊन ग्राहकांना रांगेत उभे करून भाजी खरेदी करण्यास सांगितले त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.ग्राहकांना व भाजी विक्रेत्यांना येथे गैरसोय होऊ नये यासाठी येत्या काही दिवसात तात्पुरत्या उपाय म्हणून पटांगणात रेजगा (नदी मधील रेती) टाकणार आहोत तसेच जे भाजी व्यायसाईक नगर पंचायतीचे गाळेधारक आहेत त्या व्यावसायिकांचे स्तलंतरीत कालावधीचे भाडे माफ करण्याच्या आम्ही विचाराधीन असल्याचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले आहे.सर्वच भाजी विक्रेते व ग्राहकांनी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी न करता शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत प्रशासनास मदत करून बाजार पेठेत जेवढी गर्दी टाळता येतील तेवढी टाळावी अशी विनंती मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा