तळा (किशोर पितळे)
गेल्या वर्षी २२ मार्च रोजी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांची लग्न खोळंबली होती.अनेकांनी लग्नासाठी बुकिंग केलेली हॉल,मंडप,डेकोरेशन,वऱ्हाडा साठी ट्रॅव्हल्स, यांसह इतर अनेक बुकिंग लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आल्या होत्या याचा मोठा आर्थिक फटका वधू-वर पक्षाला बसला होता.कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आली.हळूहळू सर्व पूर्वपदावर येत असताना पुन्हा खोळंबलेली लग्न सोहळे नव्या मुहूर्तावर नवीन तारखे प्रमाणे करण्यात येऊ लागली.त्यासाठी पुन्हा हॉल, मंडप,डेकोरेशन, ट्रॅव्हल्स,बेंजो आदींची बुकिंग करण्यात येत आहे.मात्र लोकल ट्रेन सुरू केल्यामुळे पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. व ही वाढती संख्या लक्षात घेता सरकारकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने वर-वधू पक्षातील दोन्ही मंडळींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीमुळे लग्न सोहळ्यांना वेग आला असून एप्रिल व मे महिन्याच्या मुहूर्तावर असलेली लग्न सोहळे फेब्रुवारी व मार्च महिन्यातच आटोपण्याची लगीनघाई वधू-वर पक्षांकडून केली जात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर सरकार कडून पुन्हा लॉकडाऊन ची घोषणा होऊ शकते व यामुळे लग्न सोहळ्यांवर परिणाम होऊन पुन्हा बुकिंग रद्द झाल्या तर दोन्ही मंडळींना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून लवकरच मिळेल त्या मुहूर्तावर लग्न आटोपण्याची तयारी वधू-वर पक्षांकडून केली जात आहे.
Post a Comment