व्यक्तिविशेष : रायगड चे सुपुत्र आणि आरबीआयचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख

व्यक्तिविशेष : रायगड चे सुपुत्र आणि आरबीआयचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख


टीम म्हसळा लाईव्ह

आज अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख उर्फ सी.डी. देशमुख यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म १४ जानेवारी १८९६ रायगड जिल्यातील नाते या गावी झाला होता. सी. डी. देशमुख यांचे वडील एक सन्माननीय वकील होते तर त्यांच्या मातोश्री धार्मिक गृहिणी होत्या. ते १९१२ मध्ये मैट्रिकची परीक्षा उतीर्ण झाले. चिंतामणराव देशमुख ज्या गुणांनी उतीर्ण झाले त्याची अजूनही आठवण काढली जाते, त्यांचा तो रेकॉर्ड अजून कुणीही मोडला नाही. त्यावेळी ‘ गोविन्दाग्रज ‘ म्हणजे राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या या यशाबद्दल एक कविता लिहिली होती. त्याचप्रमाणे त्यांना संस्कृत भाषेतील जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली होती. इंग्लंडला जाऊन त्यांनी आय.सी. एस. परीक्षा दिली आणि त्या परीक्षेतही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचे अभिनंदन करताना स्वतः लोकमान्य टिळकांनीच त्याना सरकारी सेवेत राहून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता. सी .डी. देशमुख यांना त्यांच्या उत्तम प्रशासकीय सेवेसासाठी इंग्लंडच्या राजाने ” सर ” हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. ११ ऑगस्ट १९४३ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली, असा सन्मान मिळालेले ते पहिले भारतीय होते. भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे स्पेशल फायनान्सियल अँबेसेडर म्हणून अमेरिकेला पाठवले. सुमारे सात वर्षानंतर पंडित नेहरूंच्या आग्रहास्तव ते लोकसभेची पहिली निवडणूक लढले जिंकले आणि त्यांनी केंद्र-शासनात अर्थ-खात्याचा भार स्वीकारला. संसदेत या देशाचे पहिले अंदाजपत्रक सादर करून त्यावर अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करणारे ते पहिले अर्थमंत्री ठरले. त्यांचे पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतही महत्वाचे योगदान होते. त्यांनी भारतीय जीवन विम्याचे (एल.आय.सी.)राष्ट्रीयीकरण केले, त्याचप्रमाणे तंबाखूवर पहिली कर योजना सुरु करून सरकारला लाखो रुपयाचा निधीचा स्रोत सुरु करून दिला.

१९५६ साली भाषावार प्रांतरचना होत असताना केवळ मुबई राज्याच्या बाबतीत केंद्र-सरकारने अपवाद करून , गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तिवात न आणता , एकाच मुंबई राज्याला “द्विभाषिक (Bi-lingual State ) ” केलेले त्यांच्या तर्कसंगत आणि मराठी-अभिमानी वृतीला पटले नाही आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंडित नेहरूंना देऊन टाकला. नंतरच्या काळात ते UGC – University Grant Commission चे अध्यक्ष झाले. दिल्ली विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले. कलकत्त्यामधल्या, Indian Statistical Institute चे ते अध्यक्ष झाले. हैदराबाद येथील, Indian Institute of Public Administration चे प्रमुख-पद त्यांनी सांभाळले. National Book Trust चे सन्माननीय चेअरमन होते. ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

त्यांची प्रथम पत्नी, रोझिना नावाची एक ब्रिटीश महिला होती .त्या दोघांना एक मुलगी झाली होती परंतु भारत स्वतंत्र झाल्यावर, अन्य ब्रिटीश लोकांप्रमाणे रोझिना मुलीला घेऊन इंग्लंडला कायमची निघून गेली. कालांतराने, नियोजन-मंडळावर पहिल्या महिला-सभासद म्हणून नियुक्त झालेल्या विदुषी आणि सामाजिक कार्यकर्त्या, आंध्र-प्रदेशातील काकीनाडा येथे जन्मलेल्या, तेलुगु-भाषक रेवती राव, यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. त्याच दुर्गाबाई देशमुख झाल्या आणि पुढे ते दोघे हैदराबाद येथेच राहू लागले. सी. डी. देशमुख यांना अनेक पुरस्कार मिळाले. कोलकाता विश्वविद्यालयाने ‘ डॉक्टर ऑफ सायन्स ‘ ही पदवी त्यांना १९५७ मध्ये दिली. १९५९ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला १९७५ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या दोघा पती-पत्नींना एकाच वेळी , ” पद्म-विभूषण ” किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. Orient Longmann सारख्या विख्यात प्रकाशकांनी त्यांचे आत्मचरित्र ‘The Course of My Life’ १९७४ साली प्रसिद्ध केले. भारत सरकारने २००४ साली त्याच्या नावाचे डाकतिकीट काढले होते. १९६९ साली राष्ट्रपती-पदासाठी झालेल्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर हैदराबाद येथे आपले उर्वरित आयुष्य एकांतात व्यतीत करीत होते. सी .डी. देशमुख यांचे २ ऑक्टोबर १९८२ रोजी निधन झाले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा