प्रशासन व स्थानिकांच्या मदतीनें तसेच अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने भिषण आग आटोक्यात
राम भोस्तेकर माणगाव
माणगांव शहरातील मुंबई गोवा महामार्ग नजीक असणाऱ्या मोतीराम प्लाझा समोर स्वस्तिक कॉम्प्लेक्स मधील कॉटन किंग शोरूम शेजारी असणाऱ्या मोठे आयवा व मोठया गाड्यांचे स्पेअर पार्ट व ऑइल विक्रेते सद्गुरू स्पेअर पार्ट दुकानाला २७ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास अचानक आग लागल्याने माणगांव शहरात एकच हल्लकल्लोळ माजला होता, हे वृत्त समजताच माणगांव प्रशासन व पोलिसांनी वेळीच धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. व अग्निशमनदलास कळविण्यात आले, परंतु आगीची भिषणता जास्त असल्याने काही प्रमाणात आग आटोक्यात आली. मात्र त्यावर नियंत्रण मिळविणे सोपे नव्हते. अखेर महाड व रोहा नगर परिषदेच्या अग्निशमनदलाच्या गाड्या आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवुन आग विझविण्यात आली.
माणगांव मधील सद्गुरू ऑईल व स्पेअर पार्ट च्या दुकानाला आग लागुन एकुण ८६ लाख ६४ हजार ९०४ रुपयांचे स्पेअर पार्ट सामान जळुन खाक झाल्याने मोठे नुकसान झाल्याची फिर्याद माणगांव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. फिर्यादी प्रकाश अनंत उम्रटकर वय १९ व्यवसाय व्यापार यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार ईलेक्ट्रीक शाॅट सर्किटने लागलेल्या आगीत दुकानातील इंजिन ऑईल, गिअर ऑईल, हायड्रोलिक ऑईल, ब्रेक ऑईल, ग्रिस इत्यादी ऑईलचे बकेट व डबे तसेच २०० लिटर कुलंट वाॅटर, विविध नामांकीत कंपनीचे इंजीनपार्ट सर्व कंपनीचे गिअरपार्ट, सर्व कंपनी गाड्यांचे काउन पिनल्स, तसेच जवळपास सर्व स्पेअर पार्टस ईलेक्ट्रीक पार्टस, नटबोल्टस, क्लच प्लेटस, पाटे इत्यादी दुकानातील सामान आगीत जळुन खाक झाले आहे. घटना स्थळी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकार सहा. पो. निरिक्षक उध्दव सुर्वे यांनी भेट दिली असुन पुढील तपास
सहा. फौजदार सायगांवकर हे करीत आहेत.
तालुक्यात मागील दोन दिवसात आगीच्या दोन घटना, पहिली मोरबा गावात सिलेंडर स्फोट होऊन आग आणि आज रोजी ज्वलनशील स्पेअरपार्ट ऑईल दुकानाला आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी तालुक्यात अग्निशामक दलाची सोय नाही. माणगांव ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन ५ वर्ष झाली आहेत. व माणगांव हे जिल्ह्याचे मध्यावर्ती ठिकाण असुन देखिल येथे अग्निशमनची व्यवस्था नसल्याने माणगांवकरांमध्ये खंत व्यक्त करीत संतप्त नाराजीचा सुर ऐकावयास मिळत आहे. सुदैवाने तालुक्यातील घडलेल्या दोन्ही आगीच्या घटनात जीवीत हानी टळली असली तरी भविष्यात आग लागल्यास ती विझविण्यासाठी आपात्कालिन परिस्थितीत अग्निशमन दल शेजारील शहरातून माणगांवला पोहचण्यास १ तास वेळ लागतो. त्यामुळे भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या करीताच माणगांव शहरास स्वतंत्र अग्निशमन दलाची मागणी होत असुन या घटनांपासून बोध घेत प्रशासनाने माणगांव शहराकडे लक्ष केंद्रित करावे असे मत जनतेमधुन व्यक्त होत आहे.
إرسال تعليق