दुष्काळात तेरावा महिना-श्रीवर्धन येथे जात असलेल्या धान्याच्या गाडीला घोणसा घाटात अपघात:चालक बचावला
म्हसळा -रायगड(निकेश कोकचा)
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीवर्धन तालुक्यात शासकीय धान्य नेहणार्या ट्रकला रविवारी म्हसळा येथील घोणसे घाटात चालकाला वळणाचा अंदाज न अपघात झाला आहे.आधीच चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या श्रीवर्धनकरांच्या नशिबी शासकीय धान्याचा ट्रक पलटी झाल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना या म्हणी प्रमाणे होताना दिसत आहे.
कळंबोली येथील शासकीय गोडाउन येथून श्रीवर्धन येथील शासकीय गोडाउन येथे शासनाकडून मोफत वाटप साठी 22 टन धान्य (५० किलो वजनाच्या अंदाजे ४४० गोणी) एम.एच.१२ के.पी.१७९८ या ट्रक मध्ये पाठवण्यात आले होते.मात्र रविवारी २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजल्याचा सुमारास हा ट्रक घोणसे घाटात आल्यानंतर,चालकाला तीव्र उतारावरील एका वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक थोडक्यात बचावला आहे. अपघाताची माहिती प्राप्त होताच म्हसळा तहसिलदार शरद गोसावी,एपिआय धनंजय पोरे यांनी तत्काळ देवघर व घोणसे येथील ग्रामस्थ व युवकांचा मदतीने हे धान्य इतर ट्रक मध्ये भरून श्रीवर्धन येथे पाठवले.धान्याचा ट्रक पलटी झाल्यानंतर पाऊस येऊन धान्य खराब होण्याची भीती होती.मात्र चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या स्वतच्या घराचे काम सोडून घोणसे व देवघर येथील स्थानिक युवकांनी हे धान्य पाऊस येण्याआधीच दुसर्या गाडीत भरून दिल्याने त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
फोटो- म्हसळा तालुक्यातील घोणसे घाट येथे २२ टन मोफत वाटपाचा धान्य घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याचे दिसत आहे.छाया –निकेश कोकचा
Post a Comment