कार्ले धरणातील पाणी सोडल्यावरून बोर्ली पंचतनमध्ये राजकारण



श्रीकांत शेलार : दांडगुरी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या कार्ले धरणाच्या पाईपचा ऑल अज्ञात इसमाने सुरू केला व पाणी नदीत सोडले. या प्रकारावरून बोर्ली पंचतनमध्ये राजकारणातील पडद्यामागच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय हेवेदावे जरी कितीही विकोपाला गेले तरी लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या पाण्यासारख्या विषयावर तरी राजकारण करू नये , अशी लोकांची अपेक्षा आहे. विघ्नसंतोषीला हद्दपार करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बोर्ली पंचतनमधील नाक्यानाक्यावर सूत्रधाराबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या व्यक्तीने संपूर्ण गावाला वेठीस धरले असून ही व्यक्ती कोण असावी व त्याचा गुरू कोण हे शोधण्यासाठी बोर्ली पंचतनमध्ये नाक्यानाक्यावर चर्चा सुरू आहे . कुणाला तरी पैसे देऊन हा प्रकार घडवला असावा अशी चर्चा सुरू असून त्या दृष्टीने दिघी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे . असे वाईट कृत्य करणारे गावात कोण आहेत याचा लेखाजोखा सुरू असून पोलीस गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत . या प्रकरणाचा सोक्षमोक्ष नक्कीच लागेल व गुन्हेगाराला शिक्षा नक्कीच होईल , असा विश्वास धर्मराज सोनके यांनी व्यक्त केला आहे . सरपंच नम्रता गाणेकर , उपसरपंच मन्सुर गिरे यांना त्रास देण्यासाठी कोणत्या तरी विघ्नसंतोषी व्यक्तीने पाणी सोडण्याचे कृत्य केले असावे , अशी चर्चा बोर्ली पंचतनमध्ये सुरू असून या प्रकरणाने सरपंच नम्रता गाणेकर अतिशय नाराज झाल्या आहे .  गावच्या प्रमुख पदावर बसल्यानंतर विघ्नसंतोषी माणसाने असे माणुसकीला काळिमा लावणारे कृत्य करणे यावरून त्या व्यक्तीची घराची संस्कृती काय असल याचा विचार करवत नाही , अशा प्रतिक्रिया बोर्ली पंचतन गावात सुरू झाल्या आहेत . या व्यक्तीला शोधून काढून या विघ्नसंतोषी माणसाला हद्दपार करावे , अशी मागणी बोर्ली पंचतन ग्रामस्थांनी केली आहे . विशेष म्हणजे सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्याच दिवशी हा प्रकार घडल्यामुळे या मागे काही तरी राजकारण असल्याची चर्चा बोलपंचतनमध्ये सुरू आहे . बोर्ली पंचतनमध्ये सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. सरपंच नम्रता गाणेकर व उपसरपंच मन्सूर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रात्रीच अज्ञात व्यक्तीने साडे दहाच्या सुमारास बोलीपंचतन शहरास पाणी देणाचा नाल्याचे ऑल उघडून तो निघून गेल्यामुळे संपूर्ण पाणी फुकट गेले . आता एप्रिल महिना सुरू असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून मे महिन्यातील पाणीटंचाईच्या चिंतेने ग्रामस्थ ग्रासले आहेत. त्यातच या विघ्नसंतोसी माणसाने गावावर संकट आणल्यामुळे ग्रामस्थ अधिकच संतापले आहेत .

कार्ले लघु पाटबंधारे योजनेतील धरण हे कार्ले गावाच्या डोंगराळ भागामध्ये श्रीवर्धन बोर्ली पंचतन मुख्य रस्त्यापासून १ कि . मी . आतमध्ये आहे . या धरणावर बोर्ली पंचतन , दिवेआगर , भरडखोल या प्रमुख मोठ्या लोकसंख्येच्या गावांसोबत कार्ले, खुजारे पाच गावातील सुमारे २५ हजार लोकसंख्या धरणातील पाण्यावर अवलंबून आहे . सध्या या धरणामध्ये २९ टके पाणीसाठा शिल्लक असून ५ गावामध्ये १ - २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. कार्ले लघुपाटबंधारे धरणाच्या सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाययोजना नसल्याने त्याचा गैरफायदा अज्ञात इसमाने घेऊन हे नीच कृत्य केल्याने परिसरातून चीड व्यक्त होत आहे . २०१८ पर्यंत या धरणावर ३ कर्मचारी होते . ३ मजूर व १ टेक्निकल सहाय्यक कामास रुजू होता . पैकी १ मजूर व १ टेक्लनिकल सहाय्यक सेवा निवृत्त झाल्याने सध्या एकाच मजूर कर्मचा-यावर धरणाच्या सर्वच कामकाजाची जबाबदारी आहे . तर पाटबंधारे विभागाने या बाबत काहीही दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे जनतेच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाशी ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खेळ करणा-या अज्ञात इसमास शोधून काढण्याच्या मागणीने बोर्ली पंचतनमध्ये जोर धरला आहेे. कार्ले धरणातील पाणी सोडणा-या व बोर्ली पंचतन ग्रामपंचायत निवडणुकीनंतर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणा-यांचीही चौकशी होणार आहे . 

Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा