काळसुरी ग्रामस्थांचा पाण्यासाठी संघर्ष
सहा वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पेयजल योजनेचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत
प्रश्न न सुटल्यास पाणीपुरवठा कार्यालयासमोर हंडा मोर्चाचा इशारा
मप्रतिनिधी काळसुरी
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील काळसुरी गावात मागील नोव्हेंबर महिन्यापासून तीव्र पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. शासनाने सुमारे सहा वर्षांपूर्वी सुरु केलेल्या पेयजल योजनेचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत असल्याने गावातील नागरिक गंभीर अडचणीत सापडले आहेत. परिणामी गेली सहा वर्षे काळसुरी गावातील ग्रामस्थ पाण्यासाठी झगडत आहेत.
काळसुरी गावात सन २००४ पासून पथदर्शी योजनेंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र या योजनेंतर्गत टाकण्यात आलेली पाईपलाईन सध्या पूर्णतः जीर्ण झाली असून ती वारंवार नादुरुस्त होत आहे. जागोजागी पाईप फुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्या गावात नळाद्वारे पिण्याचे पाणीच येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना
दररोज एक ते दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीवरुन डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. काही वेळा नाईलाजास्तव दूषित पाणी वापरावे लागत असल्याने मागील एका महिन्यापासून कावीळ, हगवण यांसारखे पोटाचे आजार लहान मुलांसह अनेक नागरिकांना होत आहेत. याशिवाय गावात डेंगूचे तीन रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुनी पाईपलाईन तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थांना वारंवार श्रमदान करावे लागत आहे. तसेच पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सतत बैठका घ्याव्या लागत असल्याने ग्रामस्थांचा वेळ आणि आर्थिक नुकसानही होत आहे. पेयजल योजनेचे अपूर्ण काम व पाणीटंचाईबाबत तालुक्यातील पाणीपुरवठा अधिकारी फुलपगारे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शासनाने काळसुरी गावाची पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा तालुक्यातील पाणीपुरवठा कार्यालयासमोर ग्रामस्थांच्यावतीने हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा काळसुरी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र घोसाळकर, उपसरपंच विनया पेरवी, गाव अध्यक्ष संतोष नाक्ती, पाणीपुरवठा गाव कमिटी अध्यक्ष तुकाराम चाळके, जगदीश घोसाळकर, प्रमोद पेरवी, आकाश पेरवी, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व महिला व पुरुष ग्रामस्थांनी दिला आहे.
या योजनेतून येणारे पाणी अल्प असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. अजून योजना अपूर्ण असून वारंवार ग्रामस्थ्यांना संबंधित कार्यालयात पायपीट करावी लागते, परंतू कार्यालयाकडून काहीही प्रतिसाद मिळत नाही.
- राजेंद्र घोसाळकर, सरपंच, काळसुरी
ही योजना फसवी असून ग्रामस्थांची दिशाभूल करणारी आह. गावातील वयोवृद्ध महिलांना पाण्यासाठी भटकावे लागते. याकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित कार्यालयावर हंडा मोर्चा काढला जाईल.
- विजया पेरवी, उपसरपंच, काळसुरी
إرسال تعليق