टीम म्हसळा लाईव्ह
लक्षद्वीपच्या समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार चक्रीवादळाने तडाखा दिला आहे. पहाटे हे वादळ मुंबई किनारपट्टीकडे पुढे सरकले आहे. दरम्यान, यावादळानंतर मुंबई आणि परिसर, ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत रात्रीपासून चांगला पाऊस पडत आहेत. कोकणात वादळीवाऱ्यासह पाऊसही झाला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडलीत. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे आणि छप्परही उडाले.
अरबी समुद्रात तयार झालेले ताउत्की चक्रीवादळ रायगडच्या किनाऱ्यावर घोंगावत आहे. मध्यरात्रीनंतर 2 वाजण्याच्या सुमारास बाणकोट हरिहरेशवर येथून रायगड हद्दीत प्रवेश केला. सकाळी 5 वाजता अलिबाग समुद्रात पोहोचले. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण 170 ते 200 सागरी मैल अंतरावर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. तर जिल्हाभरात सुमारे 8 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. रायगड जिल्ह्यातील 6 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. चक्रीवादळ धोके आणि उपाय योजनांची माहिती देण्यासाठी एसएमएस ब्लास्टर सेवा जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यान्वित करण्यात आली आहे.
मागील वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव पाहता नागरिकांमध्ये भीती होती लोकांनी रात्र जागून काढली. रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार वारे आणि पाऊस सुरु आहे. वाऱ्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील 4 ते 5 गावात घरांची पडझड झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलादपूर तालुक्यातही घरांचे नुकसान झाले. सध्यातरी मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सद्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. चक्रीवादळाची मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण
"ताऊक्ते" चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले असून तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे---
अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158
या एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
समुद्र किनारी जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतरण
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे. रत्नागिरी 3896 ,सिंधुदुर्ग 144 आणि रायगड 7,866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
إرسال تعليق