गीते रायगडचे मतदारच नसल्याने त्यांची तिथल्या मातीशी, लोकांशी बांधिलकी नाही



प्रतिनिधी : म्हसळा लाईव्ह
आपल्या लोकसभा मतदार संघात मोबाइल कनेक्टिव्हिटी, पिण्याचे पाणी, मुंबई-गोवा महामार्ग, इतर रस्ते यांची कामे खासदार नाही तर कोण करणार? गीते हे मुळात रायगडचे मतदारच नसल्याने त्यांची तिथल्या मातीशी, लोकांशी बांधिलकी नाही. आपलेपणातून येथील लोकांसाठी काही करण्याची त्यांची मानसिकता नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे. रविवारी मुंबईत दादर येथील श्रीकृष्ण सभागृहात म्हसळा तालुक्यातील मुंबईकरांच्या मेळाव्यात बोलत होते.
या वेळी त्यांनी अनंत गीते यांच्या निष्क्रियतेवर त्यांनी टीका केली.

मला म्हसळा तालुक्यात कुठेही डोळ्यावर पट्टी बांधून उभे केले तरी कोणते गाव कुठल्या दिशेला आहे, हे मी सांगू शकेन. मात्र, गेली ३० वर्षे खासदार राहिलेल्या अनंत गीतेंना अजून रायगडचे रस्तेही माहीत नाहीत की गावांची नावेही माहीत नाहीत, असे ते म्हणाले. केवळ दोन लाख ९९ हजार रुपयांचे काम दाखवणारा कार्यअहवाल गीतेंनी छापला आहे. याहून जास्त काम तर आमचे पंचायत समितीचे सदस्यही करतात, असा टोला लगावताना तटकरे यांनी मीच गेल्या पाच वर्षांत कमीत कमी ३२ कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे केल्याचा दावा केला. गीते यांचे काम दाखवा आणि दोन हजारांचे बक्षीस मिळवा, असे जाहीर करण्याची वेळ आली असल्याचा चिमटा काढला.

प्रचारसभेत खा. गीते आपल्या कार्यकर्त्यांना हात उंचावून पैसे घेणार नाही, अशी शपथ घ्यायला लावतात. याची खिल्ली उडवत तटकरे यांनी तुमचा कार्यकर्त्यांवर भरोसा नाय का? असा प्रश्न विचारला. तुमच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाची तुम्ही हीच किंमत करता का, असा सवाल त्यांनी गीते यांना केला. नवीद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशावर टिपणी करताना तटकरे यांनी बॅ. ए. आर. अंतुले हे धर्मनिरपेक्ष विचारांचे अत्यंत ताकदीचे नेते होते, असे म्हणत वारसा हा रक्ताचा नसून विचारांचा असतो, असा टोला लागावला. आज देशाचे संविधान धोक्यात असताना आपल्याला सार्वभौमत्व व लोकशाही यांचे संरक्षण करण्यासाठी, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा सशक्त समाज घडवण्यासाठीच झटायला हवे, असे ते म्हणाले. आम्हाला कुणी जात, धर्म विचारला तर आम्ही भारतीय असेच सांगतो, कारण विकासाला जात नसते. २४ तास आपल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो, याचाच विचार डोक्यात असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत राहणाऱ्या रायगडकरांनी मोठ्या संख्येने गावी येऊन मतदान करावे, असे आवाहन तटकरे यांनी उपस्थितांना केले.
एक मतही महत्त्वाचे आहे, त्यामुळे कोणीही हलगर्जी करू नये, अशी सूचना मुंबईत राहणाऱ्या म्हसळा श्रीवर्धनच्या मतदारांना केली. या वेळी चिपखल ग्रामपंचायत हद्दीतील २५० ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


'श्रीवर्धनचा पर्यटन विकास साधण्यात सुनील तटकरे यशस्वी'
श्रीवर्धन च्या सौंदर्यात भर टाकून येथे पर्यटनाचा विकास करून घरोघरी रोजगार निर्माण करण्याचे काम सुनील तटकरे यांनी केले असल्याचा दावा आमदार अनिकेत तटकरे यांनी रविवारी बोलताना केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन तालुक्यातील मुंबईकरांचा मेळावा रविवारी मुंबईतील दादर येथील श्रीकृष्ण सभागृहात घेण्यात आला. या वेळी आ. अनिकेत तटकरे बोलत होते.


Post a Comment

أحدث أقدم

नक्की वाचा