नवी मुंबई । प्रतिनिधी
नवी मुंबई पालिका ही सर्वांत श्रीमंत पालिका आहे. या पालिकेला एमएमआरडीए, केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून अनुदान येते. मात्र त्या अनुदानाचा वापर सत्ताधार्यांनी विकासासाठी केला नाही. पालिका अस्तित्वात आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी गोरगरिबांना शिक्षण देण्याच्या नावाखाली जमिनी लाटल्या. टक्केवारीने पोखरलेली ही महानगरपालिका आहे. शिक्षणाचे भांडवल करणार्या नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई विकास आघाडीफ तर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम गुरुवारी (दि.2) पार पडला.
या वेळी आ. अबू असीम आझमी, आ. कपिल पाटील, रिपब्लिकन सेनानीचे आनंदराज आंबेडकर, शेकापचे चिटणीस राजेंद्र कोरडे तसेच खाजमिया पटेल, अफसर इमाम, पनवेल विधानसभा अध्यक्ष कदिरभाई कच्छी, प्रसाद साळवी, हिरामण पवार, सुधाकर जाधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले कि, आम्ही सर्वधर्म सर्वभौम मानणारे लोक आहोत. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना साडे बारा टक्के मोबदला आम्ही मिळवून दिला. नवी मुंबई विमानतळ बधितांनाही बावीस टक्के मोबदला दिला. सत्तेसाठी कामे न करता जनहितासाठी नेहमीच काम केले. भविष्यात विकास आघाडीच्या माध्यमातून गरिबांसाठी मोफत दवाखाना, शिक्षण देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबई शहरातील सिडको वसाहती, गाव-गावठाण आणि झोपडपट्टी भागात गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या असून त्या सोडविण्याकडे सत्ताधारी सरकारने दुर्लक्ष केले आहे. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून नागरिकांना न्याय देण्यासाठी लोकशाहीला मानणारे राजकीय पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून नवी मुंबई विकास आघाडी केली आहे. नवी मुंबई शहरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध 13 पक्ष आणि संघटना एकत्र आल्या आहेत.
मेळाव्याचे प्रास्ताविक शेकाप चिटणीस राजेंद्र कोरडे यांनी केले. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील परिवहन सेवा, शिक्षण विभागाचे वाभाडे काढले. नवी मुंबईतील भूखंडांचे नेत्यांना भांडवल केल्याचे आरोपही त्यांनी केला.
जर आमचे मत घेता मग आमच्या घरावर बुलडोझर का फिरवता? नवी मुंबईतील धनदागड्याची मुजोरी थांबवण्यासाठी नवी मुंबई विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे.- आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेनानी
शहरांची नावे बदलल्याने लोकांची गरिबी दूर होईल का? सरकारने केवळ नवीन शहरे बनवण्याचा घाट न घालता लोकांची गरिबी दूर करावी. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबई विकास आघाडीच्या वतीने लढू आणि आपली ताकद दाखवू.
- आ. अबू असीम आझमी
नवी मुंबईतील शिक्षणाची अवस्था फार बिकट आहे. गोरगरिबांना मोफत शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आमची शिक्षण संघटना ताकदीनिशी नवी मुंबई विकास आघडीच्या पाठीशी राहिल.- आ. कपिल पाटील
या संघटना एकत्र लढणार
या नवी मुंबई विकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन सेना, समाजवादी पक्ष, स्वराज इंडिया, रिपब्लिकन पक्ष, आर.के.जनता दल, सेक्युलर, सोशालिस्ट पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, घर हक्क संघर्ष समिती, महाराष्ट्र जनशक्ती सेना, वंचित समाज, इंसाफ पार्टी आदी संघटना एकत्र आल्या आहेत.
إرسال تعليق